K CHandrashekhar Rao Sarkarnama
देश

Telangana Election Result 2023 : 'फार्म हाऊस'वरून सत्ता हाकणाऱ्या केसीआर यांना 'कौटुंबिक' विकास नडला ?

Anand Surwase

Telangana Election Result : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएसच्या सत्तेला सुरुंग लावल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलातून दिसून येत आहे. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन दोन टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्या हातातून तेलंगणाची सत्ता निसटताना दिसून येत आहे. यामागे परिवारवाद, फार्म हाऊसवरून सत्ता हाकणे, भ्रष्टाचार यासह इतर कारणांमुळे तेलंगणात परिवर्तन होत असल्याची चर्चा आहे.

तेलंगणात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचे केसीआर यांचे स्वप्न भंगताना दिसून येत आहे. 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीचे श्रेय घेत सत्तेत आलेल्या केसीआर यांना 2018 मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेऊन मिळवलेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढला होता.

सुरुवातीला त्यांनी राज्यात शेती, वीज आणि पाणी या मुद्द्यांवर भर देऊन जनतेची मने जिंकली. मात्र, तेलंगणाच्या राजकारणात स्थिर होत असतानाच त्यांनी पक्ष विस्तारासाठी पक्षाचे बदलेले नाव, कुटुंबातच सत्तेचे केंद्रीकरण, जनतेच्या प्रश्नांना बगल, फार्महाऊस सत्ता हाकणे या सर्व जनतेच्या मनातील नाराजीच्या मुद्द्यांचे भांडवल काँग्रेसने केले. काँग्रेसने आखलेल्या रणनीतीमुळे केसीआर यांना मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचे राजकीय चर्चा आहे.

कुटुंबासाठी सत्ता

केसीआर यांच्या बीआरएस पक्षामध्ये कुटंबातील सदस्यांचे वर्चस्व वाढत होते. केसीआर यांचा मुलगा केटीआर, मुलगी के कविता, पुतण्या हरिश राव यांचा पक्षामध्ये वरचष्मा राहिला आहे. मुलगा केटीआर यांचा पक्षातील दबदबाही वाढला आहे. त्यामुळे बीआरएस हा पक्ष नसून केसीआर कुटुंबाने सुरू केलेली खासगी कंपनी असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच केली जात होती. मोदी, राहुल गांधींनीही त्यांच्या परिवारवादावरून जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच जनतेमध्येही या कौटुंबिक पक्षीय विस्तार आणि विकासाच्या मुद्द्यावरून नाराजी होती. त्याचा उद्रेक मतपेटीतून दिसून येत आहे.

मंत्रालयात अत्यल्प उपस्थिती

केसीआर हे मुख्यमंत्री असले तरी त्यांची मंत्रालय आणि सचिवालयामधील उपस्थिती अत्यल्प होती. ते बहुतांशवेळा त्यांच्या 'फार्म हाऊस'वरूनच राज्याचा कारभार हाकत होते. त्यातच स्वपक्षीय आमदारांनाही भेटण्यासाठी वेळ दिला जात नसल्याने केसीआर यांच्यावर काही आमदार नाराज होते. त्यामुळे त्यांच्या या फॉर्म हाऊसवरून सत्ता हाकण्याच्या संस्कृतीला विरोधकांनी जोरदार विरोध करत जनतेमध्ये वातावरण विरोधी वातावरण निर्मिती केली त्याचा फटकाही केसीआर यांना या निवडणुकीत बसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रादेशिक अस्मितेला तडा

केसीआर यांनी पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने तेलंगणा राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे नाव दिले होते. मात्र, तेलंगणा नाव बदलून केसीआर यांनी प्रादेशिक अस्मितेची ओळख पुसण्याचे काम केले असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली होती. बीआरएस या नावासह केसीआर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र, त्याचाही फटका या निवडणुकीमध्ये बसल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसने साधले 'टायमिंग'

काँग्रेसने तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी रेवंथ रेड्डी यांची निवड करत अचूक टायमिंग साधत योग्य व्यक्तीची निवड केली. रेवंथ रेड्डी यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेत केसीआर यांच्या कमकुवत बाजूंवर घणाघात सुरू केला. युवकांसाठी रोजगार, राज्यातील भ्रष्टाचार, शेतकरी मजुरांच्या समस्या, भाजपसोबत बीआरएसची वाढती जवळीक या मुद्द्यांवरून रेवंथ रेड्डींनी राण उठवले. तसेच उत्तर तेलंगणा आणि दक्षिण तेलंगणा यांच्यात असमतोल विकासाच्या मुद्द्यावर केसीआर यांच्या विरोधात नाराजी होती. केसीआर यांनी उत्तर तेलंगणाच्या विकासाला झुकते माप दिले होते. त्यामुळे दक्षिण तेलंगणातील मतदारसंघात केसीआर यांच्याबद्दल राग होता. त्याचाच फायदा काँग्रेसला या निवडणुकीत होताना दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT