PM Narendra Modi Birthday Sarkarnama
देश

Narendra Modi : काँग्रेस चारीमुंड्या चित, मोदींचं पहिलं ट्विट; म्हणाले...

Deepak Kulkarni

Pune News : लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या पाचपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने काँग्रेसला चारीमुंड्या चित करत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

तर तेलंगणातही भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या गोटात प्रचंड शांतता पसरली आहे. भाजपकडून या दणदणीत विजयाचा जल्लोष साजरा केला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील विजयासह तेलंगणातील पराभवावर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या तीन राज्यांतील विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी या विजयासाठी दणदणीत विजयासाठी जनता जनार्दनाचे आभार मानले आहेत. आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

तसेच त्यांनी दिवस-रात्र एक करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही कौतुक केले आहेत. याचवेळी त्यांनी तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू असं सांगतानाच भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये काय म्हणाले...?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणाले, जनतेला सलाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. या सर्व राज्यातील कुटुंबीयांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू. त्यानिमित्त पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार असेही ते म्हणाले.

तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपची (BJP) विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कौतुक करता येणार नाही.विकसित भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचा आहे. आज आम्ही एकत्रितपणे या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले असल्याची भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

तेलंगणातील भाजपच्या पराभवावर मोदी म्हणाले...

तीन राज्यांतील विजय मिळविलेल्या भाजपला तेलंगणात पराभव स्वीकारावा लागला.यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या प्रिय, तेलंगणाच्या भगिनींनो आणि बांधवांनो,आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद.गेल्या काही वर्षांमध्ये हा पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू.भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

आगामी वर्षी लोकसभा निवडणुका होत आहेत.या पार्श्वभूमीवर भाजपसह काँग्रेसनेही पाच राज्यांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. दिग्गज नेत्यांचा फौजफाटा मैदानात उतरवत प्रचारात दोन्ही पक्षांनी कोणतीही कमतरता ठेवली नव्हती.पण या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली आहे, तर लोकसभेसाठी भाजपला विरोधातील पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीची निर्मिती केलेल्या काँग्रेस (Congress) साठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT