Sudhakar Singh
Sudhakar Singh Sarkarnama
देश

नितीशकुमार सरकारमधील मंत्र्याची अवघ्या दीड महिन्यात पडली विकेट!

सरकारनामा ब्यूरो

पाटणा : भाजपपासून (BJP) काडीमोड घेऊन राष्ट्रीय जनता दलाबरोबर (RJD) सरकार स्थापन केलेल्या नितीशकुमार (Nitish Kumar) मंत्रिमंडळातील कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंह हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार (Bihar) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते सुधाकर सिंह यांचे वडीलही आहेत. दरम्यान, दोन महिने पूर्ण होण्याआधीच नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील एक विकेट पडली आहे. (Bihar Agriculture Minister Sudhakar Singh Resignation)

नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती करून राज्यात पुन्हा सत्ता मिळविली होती. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी १० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याला येत्या १० ऑक्टोबर रोजी दोन महिने पूर्ण होत आहेत. पण, त्याआधीच नितीशकुमार यांच्या एका सहकाऱ्याला राजीनामा द्यावा लागला आहे.

बिहारचे कृषी मंत्री सुधाकर सिंह गेल्या महिन्यात त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत होते. कैमूर येथील सभेत बोलताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले होते की, कृषी विभागात अनेक चोर आहेत. ते चोरांचे सरदार आहेत. माझ्यावरही अनेक चोर आहेत. त्यांच्या विधानामुळे झालेल्या वादानंतर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी खडसावल्यानंतरही मी माझ्या विधानावर ठाम असून पाहिजे तर तुम्ही माझा राजीनामा घ्या, असे उत्तर सुधाकर सिंह यांनी दिले होते.

कृषिमंत्री सुधाकर सिंह यांच्या वक्तव्यावरून गेल्या महिन्यात बिहारचे राजकारण तापले होते. पाटणा येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुधाकर सिंह यांना ‘सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना सावधगिरी आणि संयम बाळगावा,’ असे सांगितले. त्यावर सुधाकर सिंह म्हणाले होते की, मी माझ्या विधानावर ठाम आहे आणि पाहिजे तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजनीमा देतो, असे उलट उत्तर देऊन ते तेथून निघून गेले होते. याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये येताच ‘जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जे काही निर्णय घेतील, तो मला मान्य आहे,’ असे स्पष्टीकरण कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी दिले होते.

कैमूरमधील एका सभेत सुधाकर सिंह म्हणाले होते की, आमच्या विभागाचा असा एकही भाग नाही, ज्यामध्ये चोरी होत नाही. त्यामुळे आम्ही चोरांचे सरदार बनलो आहोत. आम्ही एकटेच सरदार नाही, तर आमच्यापेक्षाही वरचे अनेक लोक आहेत. बियाणे महामंडळ शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी १०० ते १५० कोटींची चोरी करतात, असेही विधान त्यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT