Tejaswi Yadav
Tejaswi Yadav  Sarkarnama
देश

Tejaswi Yadav News: नितीश कुमारांच्या 'पलटी'नंतर तेजस्वी यादवांचा झंझावात; जनविश्वास यात्रेनं वातावरण फिरवलं

Anand Surwase

Bihar Political News : नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या साथीने बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. भाजपच्या राजकीय खेळीनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी जनविश्वास यात्रा काढत तब्बल 3000 किमी राज्यभरात झंझावाती दौरा केला. यादव यांच्या या जनविश्वास यात्रेला जनतेचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या यात्रेदरम्यान तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही टीकेचे बाण सोडले आहेत.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाच भाजपने नितीश कुमार यांना हाताशी धरून बिहारमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी केले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागलेल्या राजद नेते तेजस्वी यादव यांनी एनडीएच्या विरोधात रणशिंग फुंकत 20 फेब्रुवारी 2024 पासून राज्यात जनविश्वास यात्रा सुरू केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादव यांची ही यात्रा महत्वाची मानली जात आहे.

जनविश्वास यात्रेच्या माध्यमातून तेजस्वी यादव यांनी 10 दिवसात तब्बल 3000 किमीचा परिसर पिंजून काढला आहे. या यात्रेदरम्यान, यादव हे दररोज 3 ते 4 जिल्ह्यांचा दौरा करत ठिकठिकाणी जाहीर सभांना संबोधित करत आहेत. त्यांच्या या यात्रेला जनतेमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे देखील नितीश कुमार आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झालेले दिसून आले.

यादव यांनी शेतकरी, बेरोजगारी, महागाई यावर उपायोजना करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची टीका केली. तर नितीश कुमार (Nitish Kumar)आता म्हातारे झाले आहेत, त्यांच्याकडून आता बिहारची सत्ता सांभाळणे शक्य नसल्याचाही टोला त्यांनी नितीश कुमार यांच्यावर लगावल. दरम्यान, मागील 17 महिन्याच्या काळात महागठबंधन सरकारने केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी जनतेपुढे मांडला आहे. तसेच आगामी काळात राष्ट्रीय जनता दलास एक संधी देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महारॅली काढणार

राजद नेते तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेला जनतेमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी जनविश्वास यात्रे संपवून तेजस्वी यादव पटणा मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, या जनविश्वास रॅलीनंतर आता तेजस्वी यादव यांनी 3 मार्चला पटणामध्ये जन विश्वास महारॅलीचे आयोजन केले आहे. ही महारॅली पटणा मधील गांधी मैदानात पार पडणार असून यासाठी 10 लाखांपक्षा जास्त लोक सहभागी होणार असल्याचा दावा राजदकडून करण्यात आला आहे. या रॅलीतून तेजस्वी यादव लोकसभेचे रणशिंग फुकण्याची शक्यता असून ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

जरांगे पाटलांप्रमाणे प्रतिसाद

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला हजारोंंच्या संख्येने मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत होता. नियोजित सभांना 8-10 उशीर होत होता. त्याच प्रमाणे तेजस्वी यादव यांच्या जनविश्वास यात्रेलादेखील जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यादव यांच्या यात्रेला प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने जनतेची उपस्थिती दिसून आली. त्यामुळे यादव यांच्या सभा रात्री बेरात्री पार पडल्या असून तेवढ्या उशिरापर्यंत जनता त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT