Amit Shah nitish kumar bihar.jpg Sarkarnama
देश

BJP Bihar Election Plan: बिहारमधून मोठी अपडेट, अमित शाहांच्या डोक्यात 'महाराष्ट्र पॅटर्न'? नितीश कुमारांची भेट, 60 दिवसांचा 'मास्टर प्लॅन'

Bihar politics update : गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्रात जो पॅटर्न राबवला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

Bihar News: गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं होतं. ना भूतो न भविष्यती असं यश मिळवतानाच 288 पैकी तब्बल 237 जागांवर महायुतीनं बाजी मारली होती. तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारा संख्याबळाचा आकडा गाठणंही अवघड झालं. पण हे यश काय एका दिवसांत मिळालं नव्हतं. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) महाराष्ट्रात जो पॅटर्न राबवला होता,त्याचीच पुनरावृत्ती आता आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत स्वबळावर केंद्रात पुन्हा सत्तेत परतण्याचं स्वप्नं भंगलं होतं. केंद्रात दहा वर्षांपासून एकहाती सत्ता राखणाऱ्या भाजपला मात्र, 2024 मध्ये निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं जमलं नाही. पण त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांसह दिल्ली विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत कमबॅक केलं.

आता बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकतही भाजपनं आपला विजयाचा सिलसिला कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीतही आपल्याच पक्षाचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपनं मोठी पावल उचलल्याचं दिसून येत आहे. त्यातही महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती बिहारमध्ये करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारची (Bihar) निवडणूक भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अत्यंत खडतर असल्याचं सांगत धोक्याची जाणीव करुन देत एनडीएच्या कार्यकर्त्यांना अलर्ट केलं आहे. बिहारमधील वाढती बेरोजगारी, स्थलांतर शिक्षण यांसह इतर विविध मुद्द्यांवरून नितीश कुमार सरकारला सत्ताविरोधी उद्रेकाचा सामना करावा लागू शकतो. याची जाणीव असलेल्या अमित शाह यांनी बिहारबाबत सावध भूमिका घेतली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत भाजपचे खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद प्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे 2400 जणांसह ही जम्बो बैठक पार पडली.

भाजपचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी या बैठकीत बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याचे संकेतही दिले आहेत. त्यांनी बिहारमध्ये भाजप प्रणित एनडीएला दोन तृतीयांश जागा जिंकण्याचं ध्येय ठरवून दिल्याची माहिती समोर येत आहेत. तसेच याच हेतूनं तयारीला लागण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

अमित शाह यांनी यावेळी भाजप नेते पदाधिकारी,कार्यकर्ते यांना जनतेत जा, राज्य आणि केंद्र सरकारनं केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आदेश असून तब्बल 60 दिवसांचा निवडणूक प्लॅनही आखला आहे. विरोधकांचं आव्हान स्वीकारत दमदार कामगिरी करण्याचा कानमंत्रही शहांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

भाजपचा यंदा मुख्यमंत्रि‍पदावर डोळा...

भाजपनं बिहारमध्ये 2020 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागा कमी असतानाही नितीश कुमारांना मुख्यमंत्रि‍पदाची संधी दिली होती. दिलं. महाराष्ट्रातही भाजपनं एकनाथ शिंदेंना 2022 मध्ये कमी जागा असताना मुख्यमंत्री बनवलं होतं.

विधानसभेच्या 2024 निवडणुकीत एकहाती सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या भाजपनं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसवलं. महाराष्ट्रात भाजपनं शिंदे यांच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदेंचं नाव जाहीर न करत हातचा राखला होता.

आता बिहारमध्ये भाजपनं याच दिशेनं राजकीय पावले टाकल्याचं बोललं जात आहे. कारण विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं असलं तरी मुख्यमंत्रि‍पदासाठी नितीश कुमार यांचा चेहरा पुढे आणलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकत स्वबळावर बहुमताजवळ पोहोचण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्लॅननुसार ते शक्य झालं तर, तिथे भाजपला मित्रपक्षांच्या टेकूची नक्कीच आवश्यकता भासणार नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 30 मार्च रोजी केलेल्या बिहार दौर्यावेळी भाजपाच्या 84 आमदारांना अलर्ट करतानाच बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यात पक्षसंघटनाचं जाळं मजबूत करण्यासंबंधीच्या सूचनाही शाह यांनी यावेळी दिल्या होत्या.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुका 2026 मध्ये होत आहे. त्याआधी बिहारची निवडणूक जिंकणं एनडीएसाठी त्यातल्या भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण याच निवडणुकीमुळे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बिहारसारखं मोठं राज्य जिंकल्यानंतर चांगलीच ताकद वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT