Kaushal Kishore, PM Narendra Modi Sarkarnama
देश

BJP News : चेंडू जितका वर जायचा होता तो गेला, आता वेगाने खाली..! भाजपच्या बड्या नेत्याचे बंडाचे संकेत, माजी केंद्रीय मंत्र्यांची पत्नीही आहे आमदार

Kaushal Kishore social media post, BJP internal conflict : उत्तर प्रदेशात भाजपच्या दलित नेत्याचा सूचक सोशल मीडिया इशारा; ‘चेंडू खाली येतो तेव्हा वेग वाढतो’ या पोस्टमुळे पक्षात खळबळ, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना उधाण.

Rajanand More

Uttar Pradesh politics : उत्तर प्रदेशातील भाजपचे मातब्बल दलित नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर कौशल किशोर यांच्या भूमिकेमुळे राज्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.

कौशल किशोर हे उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज या लोकसभा मतदारसंघाचे २०१४ ते २०२४ असे दहा वर्षे खासदार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जुलै २०२१ ते जून २०२४ या कालावधीत ते गृहनिर्माण व शहरी कामकाज राज्यमंत्री होते. त्यांच्या पत्नीही सध्या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. राज्यातील दलित नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

कौशल किशोर काय म्हणाले?

कौशल किशोर यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज माझी एका मित्रासोबत चर्चा सुरू होती. त्यांनी म्हटले की, चेंडू जितका वर जायला हवा होता, तो गेला. आता चेंडू खाली येत आहे. खाली येण्याचा वेगही वाढत जातो, आणि तो चेंडूचा हा वेग कुणीच कमी करू शकत नाही.' कौशल किशोर यांनी या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतले नसले तरी भाजप पक्षांतर्गत मतेभेदाबाबत त्यांनी संकेत दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये कौशल किशोर यांचे नाव घेतले जाते. राज्यातील अनुभवी नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच कौशल किशोर यांची पोस्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यांनी पक्षनेतृत्व आणि राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

कौशल किशोर यांनी या पोस्टबाबत अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. तसेच त्यावर भाजपमधूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात आगामी निवडणूकही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच तरूण चेहऱ्यांनाही अधिकाधिक संधी मिळू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT