Jan Dhan Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत सुरू असलेल्या निष्क्रिय खात्यांबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बऱ्याच काळापासून वापरली जात नाहीत अशा खात्यांना सरकार बंद करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत होती.
त्यामुळे कोट्यवधी खातेधारकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला. मात्र आता केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत खातेदारांना दिलासा मिळाला आहे. वित्त मंत्रालयाने या दाव्यांना फेटाळून लावला आहे.
वित्त सेवा विभागाने मंगळवारी एक निवेदन जारी करत म्हटलं, “प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत निष्क्रिय खात्यांबाबत कोणताही बंद करण्याचा आदेश बँकांना देण्यात आलेला नाही.” त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
याचबरोबर, ज्या खात्यांमध्ये मागील 24 महिन्यांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, अशा खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी खातेदारांशी संपर्क करून त्यांची खाती पुन्हा सक्रीय करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जुलै 2025 पासून तीन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे.
सरकारने 28 ऑगस्ट 2014 ला ही योजना सुरू केली असून, आजपर्यंत देशभरात 55.69 कोटी लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत खाती उघडली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 2.59 लाख कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्या आहेत. सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे जनधन खातेदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.