Congress Nyay Yatra Sarkarnama
देश

Congress Nyay Yatra : न्याय यात्रेवर लाठीचार्ज; राहुल गांधी आसाममध्ये अडकणार? मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना आदेश

Anand Surwase

Assam News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून मंगळवारी या यात्रेवर गुवाहाटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या झटापटीला जबाबदार धरत राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) गुवाहाटीच्या सीमेवर आली होती. त्यावेळी येथील पोलिस प्रशासनाने काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेला गुवाहाटीमध्ये प्रवेश देण्यास रोखले. पोलिसांनी एंट्री पाॅईंटवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावले होते. दरम्यान, भारत जोडो यात्रेतील सहभागी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे.

याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, मी आसाम पोलिस दलाचे DGP यांना सूचना दिल्या की, भारत जोडो यात्रेतील गर्दीला उकसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसची न्याय यात्रा गुवाहटीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होती.मात्र, मंगळवारी कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने 5000 नागरिकांची ही यात्रा शहरात आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होणार होती. त्यामुळे त्यांना मुख्य रस्त्याने गुवाहटीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्याऐवजी त्यांना शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 27 वरून जो शहराच्या रिंग रोड प्रमाणे आहे, त्या मार्गने जाण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले बॅरीकेड्स तोडून घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

सोमवारीही झाला गदारोळ

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सोमवारी आसाममध्ये दाखल झाल्यापासून भाजप सरकारकडून यात्रेला विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सोमवारी देखील अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना राहुल गांधी यांनी आसाममधील बटाद्रवा मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यासाठी राम मंदिरातील सोहळा पूर्ण झाल्याशिवाय कोणाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे कारण देण्यात आले होते. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने देखील राहुल गांधी यांना दुपारी 3 वाजण्यापूर्वी मंदिरात प्रवेश देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मंदिराच्या बाहेर रस्त्यावरच भजन करत निषेध नोंदवला होता.

(Edited By - Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT