Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : मी वीस वर्षे राजकारणात, पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलो जिथे..! राहुल गांधी झाले भावूक

Rajanand More

Manipur News : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आज मणिपूर येथून सुरूवात झाली. ही यात्रा 67 दिवस चालणार असून 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. संपूर्ण यात्रेत पक्षाचे नेते राहुल गांधी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

यात्रेला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजपवर (BJP) शरसंधान साधले. ते म्हणाले, मी 2004 पासून राजकारणात आहे. पण पहिल्यांदाच भारतातील अशा एका ठिकाणी आलोय जिथे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था कोलमडली आहे. 29 जूननंतर मणिपूर हे मणिपूर राहिले नाही. सर्वत्र द्वेष पसरला असून दोन तुकडे झाले आहेत. लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला.

अनेकांना आपल्या जवळच्यांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहावा लागला. पण त्यानंतर भारताचे पंतप्रधान नागरिकांचे डोळे पुसण्यासाठी, त्यांना आधार देण्यात इथे आले नाहीत. कदाचित मोदी, भाजप आणि आरएसएससाठी मणिपूर भारतासाठी भाग नाही, अशी हल्लाबोल राहुल यांनी केला. मणिपूर (Manipur) हे भाजपच्या राजकारणाचा सिम्बॉल आहे. भाजप आणि आरएसएसच्या द्वेषाचे, विचारधारेचा सिम्बॉल असल्याची टीकाही राहुल यांनी केली. यावेळी बोलताना राहुल गांधी भावूक झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज सुरू झालेली न्याय यात्रेचा समारोप 20 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा जवळपास 100 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. मणिपूर, नागालँड, झारखंड, आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशीच माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत धक्का दिला. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला जाणार असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT