Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir Sarkarnama
देश

काँग्रेसचं ठरलं! अखेर तिकीट वाटप अन् पदांबाबत घेतला मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

उदयपूर : राजस्थानातील उदयपूरमध्ये रविवारी काँग्रेसच्या तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबीरा'चा समारोप झाला. पक्षाच्या संघटनात्मक बदलासह अनेक महत्वाचे ठरावे या शिबीरात केले जाईल, असं सुरूवातीलाच सांगण्यात आलं होतं. त्यानुसार 'एक व्यक्ती एक पद' आणि 'एक कुटुंब एक तिकीट' या धोरणांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. (Congress Chintan Shivir Latest Marathi News)

शिबीरानंतर सर्वात जुन्या पक्षात मोठे संघनात्मक बदल पाहायला मिळतील, असं शिबीर सुरू होण्यापूर्वी पक्षाचे नेते अजय माकन यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता एका व्यक्तीकडे एकच पद राहणार आहे. त्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे.

'एक परिवार एक तिकीट' च्या महत्वाच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे, ही अट कायम ठेवण्यात आली आहे. यातून गांधी कुटुंबाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

50 वर्षांखालील नेत्यांसाठी 50 टक्के पदं

पक्षात तरूणांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी 50 वर्षांखालील नेत्यांना 50 टक्के पदांवर नियुक्ती दिली जाणार असल्याचा महत्वपूर्ण ठरावही शिबीरात करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पक्षात तरूणांना संधी मिळत नसल्याचा आरोप अनेक तरूण नेत्यांनी केला होता. त्यातून काही नेते पक्षातूनही बाहेर पडले आहेत.

देशातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी 'भारत छोडो'चा नारा दिला आहे. त्याची आठवण करून देत काँग्रेसने रविवारी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. महात्मा गांधींच्या जयंतीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा

समारोपाच्या भाषणामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या यात्रेची घोषणा केली. ही यात्रा दोन ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेमध्ये तरूण नेत्यांसह ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं या यात्रेचे आयोजन केलं आहे.

सर्व समाजघटकांतील लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी, भाजप (BJP) सरकारच्या काळात समाजा-समाजामध्ये निर्माण झालेली तेढ दूर करून एकोपा निर्माण करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते राहुल गांधी या संपूर्ण यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर 15 जूनपासून जनजागरण मोहिम राबवली जाणार आहे. भाजपच्या काळात वाढलेली बेरोजगारी, इंधन दरवाढ, सामाजिक तेढ अशा विविध मुद्दयांवर यातून लोकांना जागृत केले जाणार आहे. सोनिया गांधी यांनी भाषणाच्या शेवटी आपण जिंकणार, आपण जिंकणार, आपण जिंकणार हाच आपला संकल्प आहे, असं सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT