Gourav Vallabh Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसची ढाल असलेल्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; गंभीर आरोप करत म्हणाले...         

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला (Congress News) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. कालच बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, तर गुरुवारी पक्षाचे बडे नेते व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनीही पक्षाला राम राम ठोकला. सलग दोन दिवसांत दोन नेत्यांनी पक्षाला धक्का दिला आहे. गौरव वल्लभ यांनी पक्ष सोडताना गंभीर आरोपही केले आहेत.

गौरव वल्लभ (Gourav Vallabh) हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून, त्यांनी अनेक व्यासपीठांवर सरकारच्या ध्येय-धोरणांवर काँग्रेसची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांची आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी आज एक्स हँडलवर पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गौरव वल्लभ यांनी एक्सवर म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आज ज्याप्रकारे दिशाहीन होऊन पुढे जात आहे, त्यासोबत जाणे मला शक्य नाही. मी सनातनविरोधी नारे देऊ शकत नाही. हेल्थ क्रिएटर्सला शिव्या देऊ शकत नाही. त्यामुळे मी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खर्गे यांना पाठवलेल्या राजीनाम्यामध्ये गौरव वल्लभ यांनी लिहिले आहे की, मी पक्षात आलो त्यावेळी काँग्रेस सर्वात जुना पक्ष आहे, असे मी मानत होतो. इथे बौद्धिक लोकांची, युवकांच्या कल्पनांना वाव मिळतो. पण मागील काही वर्षांत माझ्या लक्षात आले की, पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या युवकांना सामील करून घेऊ शकत नाही. पक्षाचा कार्यकर्त्यांशी कनेक्ट पूर्ण तुटला आहे.

राम मंदिराबाबत (Ram Mandir) पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरही वल्लभ यांनी आक्षेप घेतला. पक्षाच्या या भूमिकेमुळे आपण स्तब्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इंडिया आघाडीतील (India Alliance) काही नेत्यांकडून सनातन धर्माविरोधात सतत वक्तव्य केली जात आहेत. त्यावर काँग्रेसकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नाही, असे टीका वल्लभ यांनी केली.

सध्या पक्ष चुकीच्या दिशेने जात आहे. एकीकडे जात आधारित जनगणनेवर बोलत असताना दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचे दिसून येते. हे काँग्रेसच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहे. आर्थिक धोरणांबाबत पक्षाची भूमिका सतत विरोधी असल्याचे दिसते, असेही गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे.  

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT