Rahul Gandhi  sarkarnama
देश

Rahul Gandhi: काँग्रेस नेत्यांचा पक्षाविरोधातच एल्गार! दिल्लीत करणार धरणं आंदोलन; राहुल गांधींवर केले आरोप

Congress leaders agitation against Rahul Gandhi: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती, अद्यापही इथं काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

Amit Ujagare

Congress leaders agitation against Rahul Gandhi: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव आणि पक्षाच्या नेतृत्वाकडून नेत्यांच्या समस्यांकडं दुर्लक्ष केलं जात असल्याच्या कारणानं नाराज असलेल्या बिहार काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी ८ सप्टेंबर रोजी बिहारहून मोठ्या संख्येनं काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीतील काँग्रेसचं मुख्यालय इंदिरा भवन बाहेर शांततेत धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाराज नेत्यांचा मुख्य निशाणा हा काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु आणि प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार राम हे आहेत. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, निवडणुकीत पक्षाच्या अत्यंत खराब कामगिरीला जबाबदार हेच पदाधिकारी आहेत. २०२५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती. पक्षाला इथं पक्षाच्या पदरात केवळ ६ जागाच पडल्या होत्या. तर २०२०च्या निवडणुकीत त्यांना १९ जागा मिळाल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांनी आपलीच जागा गमावली होती.

राहुल गांधींची भेट न झाल्यानं नाराजी

काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि वरिष्ठ नेते आनंद माधव यांनी सांगितलं की, बिहारचे नेते मोठ्या कालावधीपासून नेतृत्वाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटलं की, आम्ही नोव्हेंबर २०२५पासून लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला वेळ दिली जात नाहीए. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आम्ही मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल आणि अशोक गहलोत यांची भेट घेतली होती. त्यांनी आमच्या मागण्यांकडं लक्ष देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. नाईलाजानं आम्हाला धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

वरिष्ठ नेत्यांचं समर्थन

या आंदोलनात बिहार काँग्रेसचे अनेक प्रमुख चेहरे सहभागी होणार आहेत. यामध्ये बिहारचे माजी उपप्रदेशाध्यक्ष जमाल अहमद आणि राजकुमार राजन, AICCचे सदस्य नागेंद्र पासवान, माजी आमदार छत्रपती यादव, माजी सचिव बी. अख्तर आणि माजी आमदार अनिल कुमार सिंह सहभागी आहेत. तर वरिष्ठ नेते किशोर कुमार झा यांनी देखील आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, हे सर्वजण समर्पित कार्यकर्ते आहेत आणि हायकमांडला त्यांच्या तक्रारींवर लक्ष द्यावं, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT