Devendra Fadnavis News Sarkarnama
देश

Assembly Elections Results 2023 : तीन राज्यांतील भाजपच्या विजयावर फडणवीस म्हणाले, ''यातून एक गोष्ट स्पष्ट झाली...''

Mayur Ratnaparkhe

Assembly Elections Results : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या तिन्ही ठिकाणी भाजप सत्तास्थापनेच्या दिशेने आगेकूच करत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे विविध नेते मंडळींच्या आणि राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भाजपच्या या यशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''चार राज्यांच्या निकालात तीन राज्यांत भाजप अभूतपूर्व असं यश प्राप्त झालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरील विश्वासाचं यश आहे. ज्याप्रकारे मोदींनी पारदर्शी प्रामाणिकतेने गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. ज्याप्रकारे विकासाच्या मार्गावर नेलं, ज्याप्रकारे सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं की सरकार त्यांच्यासाठी काम करत आहे आणि त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहायला मिळालं, खरं म्हणजे हा त्याचा विजय आहे.

म्हणून या सर्व राज्यांतील जनतेचे आभार मी मानतोच, पण खऱ्या अर्थाने या विजयाचं श्रेय हे मोदींचं, त्यांच्या नावाचं, त्यांच्या करिष्म्याचं आहे.''

यासोबतच ''आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी .नड्डा आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासोबत त्या त्या राज्यात असणारी भाजपची टीम आणि आमची राष्ट्रीय टीम या सगळ्यांचं हे श्रेय आहे. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो,'' असंही फडणवीसांनी सांगितलं.

याचबरोबर, ''आपण जर बघितलं तर भाजपची मतं वाढलेली आहेत. विशेषकरून छत्तीसगडमध्ये १४ टक्क्यांनी ही मतं वाढलेली आहेत. मध्य प्रदेशात आठ टक्क्यांनी वाढली आहेत आणि राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.

तेलंगणातही जवळपास दहा टक्क्यांनी मतं वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भाजपवर आपल्याला पाहायला मिळतो,'' असं फडणवीस म्हणाले.

तसेच ''आपण जर आताचे कल बघितले, तर ६३९ पैकी ३३९ जागा भाजप जिंकते आहे. म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून भाजपला मिळत आहेत. हा अभूतपूर्व असा निकाल आहे आणि हा निकाल एकप्रकारे जनतेच्या मनात काय आहे? याची नांदी आहे. लोकसभेत अभूतपूर्व विजय भाजप आणि एनडीए आघाडीला मिळणार आहे, त्याची ही नांदी आहे.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे इंडीया आघाडीला लोकांनी नाकारलं आहे. राहुल गांधींच्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलं आहे. लोकांच्या मनात केवळ मोदीच आहेत,'' अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT