पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकला चांगलाच धडा शिकवला. जगभरात पाकचा दहशतवादी बुरखा फाडण्यात आला. त्यांना आता पाकिस्तानने माणुसकी सोडल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंडिगो कंपनीचे विमान 21 मेला दिल्लीतून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. या विमानामध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांसह 227 जण प्रवास करत होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच अतिवृष्टी आणि जोराच्या वाऱ्यामुळे विमानाला हादरे बसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडतो. याबाबतचा एक थरारक व्हिडीओही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रवासी जोरजोरात ओरडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, पुढील धोका लक्षात घेऊन पायलटने तातडीने जवळच्या भारतीय हवाई दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच एटीसीशी संपर्क साधला. अतिवृष्टी आणि वेगाच्या वाऱ्यापासून विमान वाचवायचे असेल तर मार्ग बदलून पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची परवानगी पायलटने मागितली होती.
पायलटने त्यानंतर लाहोर एटीसीशी संपर्क साधत आपत्कालीन लँडिंगची परवानगीही मागितली होती. मात्र, दोन्हीकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर विमानाचे श्रीनगरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात विमान भयंकर मोठ्या अपघातातून बचावल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटलटच्या कौशल्याने सुखरूपपणे सर्व प्रवाशांना श्रीनगरपर्यंत आणले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, हे विमान पंजाबमधील पठाणकोट जवळ जवळपास 36 हजार फूट उंचीवर उडत होते. त्याचवेळी अतिवृष्टी आणि वादळ सुरू झाले. विमानाला मोठे हादरे बसू लागल्यानंतर पायलटने आधी नॉर्दर्न एटीसीशी संपर्क साधत विमानाला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्याची परवागनी मागितली. पण ती परवानगी नाकारण्यात आली.
पायलटने नंतर लाहोर एटीसीशी संपर्क साधत पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी मागितली. पण पाकिस्तानने त्यास नकार दिला. त्यामुळे पायलटकडे दुसरा पर्याय नसल्याने दिल्लीला परतण्याबाबत विचार करण्यात आला. पण तसे करणे धोक्याचे असल्याचे लक्षात आल्याने पायलटने या वादळातच विमान श्रीनगरला नेण्याचा निर्णय घेतला. तेच जवळचे ठिकाण होते.
वादळामुळे ऑटोपायलट मोड बंद झाल्याने पायलटला अखेरपर्यंत मॅन्युअली सर्व गोष्टी हाताळाव्या लागल्या. त्यामुळे विमानाच्या वेगामध्ये चढउतार होत होता. वादळामुळे विमानाच्या काही यंत्रणांमध्ये बिघाड तर काही यंत्रणा खराब झाल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले आहे. एका क्षणी विमानाचा लँडिंग वेग 8500 फूट प्रति मिनिटांपर्यंत पोहचला होता. पायलट या तुफान पावसात आपल्या हाती विमानाचे नियंत्रण ठेवत विमान श्रीनगर विमानतळावर उतरवले. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. डीजीसीएकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.