Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रत्येक मंत्र्याच्या हातात एक लिफाफा दिल्याचा प्रकार घडल्याची माहिती आहे. या लिफाफ्यात नेमकं काय असेल? याची चर्चा सुरु झाली होती. लिफाफ्यात एखादी चांगली भेट असेल की एखादं गोपनिय पत्र असेल की थेट इशारा पत्र असेल? असे तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण या लिफाफ्यात जेनझी तरुणांच्या संदर्भात काहीतरी महत्वाच्या सूचना असल्याची माहिती समोर येत आहे.
कॅबिनेटच्या बैठकीला सर्वच मंत्र्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत एक महत्वाची गोष्ट या मंत्र्यांना घेऊन येण्यास सांगण्यात आलं होतं. ही गोष्ट म्हणजे प्रत्येक मंत्र्यानं आपल्या विविध सोशल मीडिया हँडलची लिंक सादर करण्यास सांगण्यात आलं होतं. तसंच गेल्या एक ते दीड महिन्यात मंत्र्यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन किती एंगेजमेंट्स मिळवल्या? हे किती अपेडट केलं गेलंय? याबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, या प्रत्येक मंत्र्यांच्या हातात एक लिफाफा देण्यात आला होता. या लिफाफ्यामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या चारही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी काय अॅक्टिव्हिटी केल्या आहेत त्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे. १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यानचा हा डेटा आहे. या चार सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये एक्स, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन या प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. या डेटामध्ये दररोज सरकारी किती पोस्ट केल्या गेल्या, प्रत्येक पोस्टला किती एंगेजमेंट आली, एकूण लाईक्स किती आल्या?, फॉलोवर्स किती देशांमध्ये आहेत याचा यामध्ये तपशील आहे. विशेष म्हणजे विरोधकांमधील नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टसोबत या मंत्र्यांच्या पोस्टच्या तपशीलाची तुलनाही करण्यात आली आहे.
बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला वरिष्ठ मंत्री निर्मला सितारामण, एस. जयशंकर आणि पियुष गोयल हे उपस्थित नव्हते. सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली जयशंकर, गोयल, राज्यमंत्री जतीन प्रसाद यांचं एक शिष्टमंडळ सध्या सिंगापूरमध्ये उच्चस्तरीय द्विपक्षीय वाणिज्य चर्चेसाठी गेले आहेत. सुत्रांनी अशीही माहिती दिली आहे की, मंत्र्यांना आता वेळोवेळी अशा प्रकारचं सोशल मीडिया परफॉर्मन्स अॅनलिसिस केलं जाणार आहे. हा उद्योग केवळ मंत्र्यांनी आपला सोशल मीडियावरील वावर वाढावा यासाठी करण्यात आला असल्याचंही सुत्रांकडून कळतं आहे. सोशल मीडियावर 'जनरेशन झेड'शी अर्थात जेनझी तरुणांशी संवाद साधण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारमधील ही ताजी घडामोड महत्वाची ठरते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना वारंवार हे आवाहन केलं आहे की त्यांनी सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त करावा, याद्वारे लोकांशी थेट संवाद साधावा तसंच सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. यामध्ये मंत्र्यांचा आणि विविध भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या कॉनक्लेव्हमध्ये देखील त्यांना सांगण्यात आलं आहे की, तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील अॅक्टिव्हिटीज हा तुमच्या परफॉर्मन्स अनॅलिसिसचा भाग असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.