Goa Monsoon session 2024 Sarkarnama
देश

GOA Assembly : पावसाळी अधिवेशनात विरोधकांची कसोटी; एकजूट दिसणार का?

सरकारनामा ब्यूरो

Goa News : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार (16 जुलै) पासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विरोधी आमदारांच्या कामगिरीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. मिळालेल्या वेळेत विरोधक म्हणून जी व्यूहरचना ठरविणे आवश्‍यक आहे, ती करण्यात विरोधी आमदारांना अपयश आल्याचे दिसत आहे. वारंवार बैठका घेऊनही सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्याचे तंत्र विरोधी आमदारांना अंमलात आणता आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीमुळे विरोधी गटात ‘इंडिया’ आघाडीच्या आमदारांमध्ये एकजूट झाली असली, तरी विरोधी असलेल्या एकमेव ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या (आरजी) आमदाराला आता विरोधक म्हणून एकहाती किल्ला लढविण्याची वेळ येणार असल्याचे सध्या यानिमित्ताने दिसत आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांची शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आली होती. त्याचवेळी पर्यटन मंत्र्यांनी पर्यटनासंबंधी बोलाविलेल्या बैठकीला ‘आप’च्या (Aap) आमदारांनी हजेरी लावल्याने ती बैठकच होऊ शकली नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून विरोधी आमदारांना एकत्र न आणण्याचा हा डाव यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

एक प्रबळ विरोधक म्हणून गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई जनता दरबार घेतात, तर तीन आमदार असणाऱ्या काँग्रेसला जनतेकडून प्रश्‍न मागविण्याचे किंवा दरबार भरविण्याची इच्छाही होत नाही.विरोधी पक्षनेते म्हणून युरी आलेमाव यांनी आपण कोणते खासगी ठराव आणणार असल्याचे जाहीर केलेही असतील, पण अधिवेशनासाठी विरोधक एकत्रितरित्या सज्ज असल्याचे दाखविण्याची जी संधी होती, ती विरोधी आमदारांनी गमावली आहे.

‘आरजी’चा आमदार लढवणार किल्ला

मी आणि कार्लुस फेरेरा संयुक्तिकरित्या नव्या राष्ट्रीय शिक्षणावर प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. गोव्यात (GOA) सर्वाधिक बेरोजगारी आहे. रोजगार निर्माण करायचे असतील तर चांगले शिक्षण हवे. विरोधी आमदारांची बैठक बोलविण्याचे विरोधी पक्षनेत्यांचे काम आहे. परंतु मी विरोधी आमदारांसोबत आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात जे विषय आणि प्रश्‍न आले होते, ते अद्याप सुटलेले नाहीत. अलीकडच्या अनेक विषयांवर विरोधक म्हणून आम्ही सभागृहात निश्‍चित सरकारला जाब विचारु, असे व्हेन्झी व्हिएगस म्हणाले.

मडगाव बैठकीत अधिवेशन रणनीती ठरली आहे. त्या बैठकीत अधिवेशनातील प्रत्येकाची भूमिका समजून घेण्यात आली. कोणते ठराव, प्रश्‍न मांडायचे, त्यावर चर्चा झाल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ने प्रथमपासून जी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून या अधिवेशनापूर्वी मला विश्‍वासात का घेतले नाही हे ठाऊक नाही; परंतु मला या बैठकीला बोलावले नव्हते, असे वीरेश बोरकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT