Union Minister Giriraj Singh  Sarkarnama
देश

Giriraj Singh : हलाल मटण सोडा, झटका मटणच खा! केंद्रीय मंत्र्यांचा हिंदूंना सल्ला

Rajanand More

Halal Meat : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे त्यांच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे ते वादातही अडकले आहेत. आता त्यांनी हिंदूंना हलाल मटण खाणे सोडून देत केवळ झटका मटणच खाण्याचा सल्ला दिला आहे. एका झटक्यात प्राण्याला मारले जात असल्याने झटका मटण खायला हवे. हलाल मटण खाऊन आपला धर्म भ्रष्ट करू नका, अशी प्रतिज्ञाच त्यांनी त्यांच्या समर्थकांना दिली.

बिहारमधील (Bihar) बेगुसराय या लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात समर्थकांशी संवाद साधताना गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी हा सल्ला दिला. विशेष म्हणजे अनेकदा कट्टर मुस्लिमांना धारेवर धरणाऱ्या गिरीराज सिंह यांनी या वेळी त्यांचे कौतुक केले. केवळ हलाल मटणच (Meat) खाण्याचा निर्णय घेतलेल्या मुस्लिमांचे (Muslim) मला कौतुक आहे. आता हिंदूंनाही (Hindu) आपल्या धार्मिक परंपरांचे अशाच प्रकारे पालन करायला हवे. मुस्लिम समाजात झटका मटण खाल्ले जात नाही. ते केवळ हलाल मटणच खात असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

केवळ झटका मटण विकणारी दुकाने हवीत

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह केवळ सल्ला देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी झटका मटण विकणारी दुकाने हवीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. हिंदूंची प्राण्यांचा बळी घेण्याची पद्धत झटका आहे. जेव्हा हिंदू जनावरांचा बळी देतात, तेव्हा ते एका झटक्यात मारतात. त्यामुळे आपल्याला हलाल मटण खाऊन भ्रष्ट व्हायचे नाही. जनावरांचा बळी एका झटक्यात घेतला जाईल, असे कत्तलखाने निर्माण करायला हवेत. तसेच केवळ झटका मटणची विक्री करणारी दुकानेही हवीत, असे गिरीराज सिंह म्हणाले.

झटका आणि हलाल मटणात काय आहे फरक?

झटका आणि हलाल मटण यावरून सातत्याने चर्चा होत असते. कोणते मटण खायचे यावरून वाद होत असतात. गिरीराज सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या जनावराचा एका झटक्यात बळी घेतला जातो, त्या जनावराचे मटण हे झटका मटण म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये विजेच्या झटक्याप्रमाणे एका झटक्यात प्राणी मारला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हलाल मटण कापताना प्राण्याच्या गळ्यावर धारदार चाकू फिरवला जातो. त्याआधी म्हणजे हलाल करण्यापूर्वी कलमा वाचून तीन वेळा चाकू फिरवण्याची मान्यता आहे. हलाल करण्यापूर्वी प्राणी बेशुद्ध व्हायला नको. हलाल करण्यापूर्वी प्राण्याला खाऊ-पिऊ घातले जाते. श्वसननलिका कापली की काही सेकंदात प्राणी मरून जातो. त्याची तडफड होत नाही.  

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT