BJP, Congress
BJP, Congress File Photo
देश

मुख्यमंत्रिपद गेलं अन् भाजपचं काँग्रेस नेत्याबाबत प्रेम उतू जाऊ लागलं!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मुख्यमंत्री असताना भाजपकडून सतत टीकास्त्र सोडलं जात होतं. पण मुख्यमंत्रिपद गेलं अन् भाजपचं काँग्रेस नेत्याबाबतच प्रेम उतू जाऊ लागलं आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांना आपुलकी वाटू लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांचं कौतूक करण्यास सुरूवात केली असून प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यासह इतर नेत्यांवर टीका सुरू केली आहे.

मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. सिध्दू यांना त्यांनी देशविरोधी म्हटलं असून सिध्दू मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाल्यास त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करण्याचे सुतोवाच केलं आहे. यानंतर अमरिंदरसिंग भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांना अमरिंदरसिंग यांच्याविषयी प्रेम वाटू लागलं आहे.

मुख्यमंत्री असताना अमरिंदरसिंग यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांचं मुख्यमंत्री पद जाणं म्हणजे राजकीय खून असल्याची टीका केली आहे. तसेच काँग्रेसच्या देशविरोधी षडयंत्रामध्ये देशप्रेमी नेते अडथळे ठरत असल्यानं त्यांना हटवण्यात आल्याचा निशाणा भाजप साधला आहे.

हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्वनी शर्मा, उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी आदी नेत्यांनी अमरिंदरसिंग यांची बाजू घेतली आहे. अमरिंदरसिंग यांच्या वक्तव्याचा आधार घेत विज म्हणाले, सिध्दू यांना पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष कऱणं हा काँग्रेसच्या देशविरोधी षडयंत्राचा एक भाग आहे. त्यामध्ये अमरिंदरसिंग यांचा अडथळा होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं तिथं जाऊन कौतूक करण्याबरोबरच सिध्दू यांनी तेथील लष्कर प्रमुखांची गळाभेट घेतली होती. ते परत आल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी याबाबत विचारणा केली होती. त्यांनी न जाण्याचा सल्लाही दिला होता. पण अमरिंदरसिंग यांच्या सल्ल्याविषयी विचारलं तेव्हा सिध्दू यांनी माझे कॅप्टन अमरिंदरसिंग नव्हे तर राहुल गांधी आहेत, असं उत्तर दिल्याचं विज म्हणाले आहेत.

सिध्दू यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत चुघ म्हणाले, सिध्दू हे देशासाठी धोकादायक असतील तर काँग्रेस नेतृत्व त्यांना सहकार्य कार करत आहे. त्यांच्यासारख्या नेत्याला देशाच्या सीमेवरील राज्याचे प्रदेशाध्यपद का देण्यात आलं, असा सवाल चुघ यांनी उपस्थित केला आहे. सिध्दू यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील आपल्या संबंधांच्या आधारे पाकिस्तान लष्कराला थांबवून दाखवतं भारतीय जवानांची मृत्यू थांबवावेत, असं शर्मा म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT