Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray: मोदींच्या विरोधात 'इंडिया आघाडी'चा चेहरा कोण ? ठाकरेंचं दिल्लीतून मोठं भाष्य

Ganesh Thombare

Delhi News: आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. त्यामुळे विरोधीपक्षांच्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दिल्लीत आहेत. या बैठकीआधी त्यांनी दिल्लीत काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

ठाकरेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत 'इंडिया' आघाडीचा चेहरा कोण असेल ? यावर मोठं भाष्य केलं आहे. मोदींविरोधात 'इंडिया' आघाडीचा चेहरा कोण, या प्रश्नावर मोजकं आणि महत्त्वाचं उत्तर देत 'इंडिया'ची रणनीती कशी असेल, या बैठकीत कोणती चर्चा होणार, अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

'बऱ्याच दिवसांनी होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत अनेक महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा होईल. आता निवडणुकीचं वर्ष सुरू होत आहे. त्यासाठी रणनीती ठरेल. आघाडीला कोणीतरी निमंत्रक असावा, चेहरा ठरवता येतो का हे ठरवावं लागेल', असं ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना खासदारांचं निलंबन करण्यात आलं. हे सगळं चित्र पाहिल्यावर लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का ? असा प्रश्न पडतो, असं म्हणत ठाकरेंनी खासदारांवर झालेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीत केजरीवाल नाराज आहेत का ?

'इंडिया' आघाडीत आम आदमी पक्ष अर्थात केजरीवाल नाराज असल्याची चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात असते. यावर ठाकरेंनी भाष्य करत अरविंद केजरीवाल नाराज नाहीत. त्यांची सोमवारीच भेट घेतली असून आघाडीत हसतं खेळतं वातावरण आहे. आमच्या दोघांच्या बैठकीत आजच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यावर विचारविनिमय झाल्याचे ठाकरेंनी सांगितले.

'इंडिया' आघाडीचा चेहरा कोण ?

इंडिया आघाडीच्या बैठकीआधी 'सामना'तून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मोदींविरोधात 'इंडिया' आघाडीचा चेहरा नेमका कोण असेल? या प्रश्नावर मोठं भाष्य केलं.

ठाकरे म्हणाले, 'पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मेपासून निवडणुका होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीत आघाडीतील काही पक्षांच्या सूचना काय येतील त्यावर आमचे मत मांडणार आहोत. या बरोबरच आघाडीला समन्वयक ठरवता येतो का ? त्याचा विचार आज नाहीतर उद्या करावाच लागेल. आम्ही एकत्र आलो असलो तरी आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही. आघाडीत मतभेद असलेले लोक एकत्र आले आहेत. कोणाच्या मनात काय आहे, हे बघावं लागेल. आम्हाला देश वाचवायचा असून सध्याच्या काही घटना पाहून देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का ? असा प्रश्न पडत आहे', असं ठाकरे म्हणाले.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT