BJP MP Janardan Mishra ethanol statement: मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचे समर्थन करताना त्यांनी या धोरणाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांना उद्देशून ‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?’ असा सवाल त्यांनी केला. रीवा विमानतळावर भोपाल-रीवा आणि कोलकाता-रीवा विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जनार्दन मिश्रा यांनी देशातील पेट्रोलियमची गरज, इथेनॉल मिश्रण आणि केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणावर भाष्य केले.
भारतामध्ये सध्या केवळ २० टक्के तेलाचे उत्पादन होते, तर उर्वरित ८० टक्के तेल परदेशातून आयात केले जाते, असा दावा मिश्रा यांनी केला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम तेलाच्या वाहतुकीवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, "आपल्या देशात केवळ २० टक्के तेलाचे उत्पादन होते, तर ८० टक्के तेल परदेशातून आयात केले जाते. सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याने तेल वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे तेल मिळवण्यासाठी तब्बल १८ हजार किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा उल्लेख करताना मिश्रा यांनी त्याला होणाऱ्या विरोधावर प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काही जण शुद्ध पेट्रोलची मागणी करत आहेत. ‘देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नसेल, तर ते येणार कुठून? तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?" असा सवाल करत मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. मात्र, त्यांनी इथेनॉलवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा थेट बाप काढल्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर यावेळी इथेनॉलच्या वापराचे समर्थन करताना त्यांनी ब्राझीलचे उदाहरण दिले. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचे उत्पादन केले जाते आणि वाहनांमध्येही त्याचा वापर केला जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ऑटोमोबाइल कंपन्यांकडे इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणारी वाहने उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.
भारतातील वाहनेही इथेनॉल मिश्रित इंधनावर चालण्यास सक्षम आहेत. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढवू नये, अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, याच कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी देशातील महागाई आणि रोजगाराच्या प्रश्नावरही भाष्य केले. जगभरात महागाईची परिस्थिती असतानाही भारतातील महागाई तुलनेने कमी असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.