PM Narendra Modi, Kirodi Lal Meena Sarkarnama
देश

Rajasthan CM : राजस्थानचे मुख्यमंत्री कोण? कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींना रक्ताने पत्र लिहून सुचवले नाव

Anand Surwase

Rajasthan News : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत भाजपने 115 जागांवर विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण? यावरून राजकीय खलबते सुरू आहेत. सद्यस्थितीत बाबा बालकनाथ, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन सिंह मेघवाल यांची नावे आघाडीवर आहेत. हे सर्व मुख्यमंत्री पदाचे दावेदार नेते आपआपल्या पातळीवर मुख्यमंत्री पदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सध्या सोशल मीडियावर किरोडी लाल मीणा यांच्या नावाला जनतेची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी अनुभवी म्हणून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांचे नाव चर्चेत होते. परंतु भाजपच्या (BJP) वरिष्ठ पातळीवर यावेळी धक्का तंत्राचा वापर करत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये  हिंदूत्वाचा चेहरा म्हणून महंत बालकनाथ आणि किरोडी लाल मीणा (Kirodi Lal Meena) यांची नावे सध्या जोरदार आघाडीवर आहेत. या नावांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाल्यास भाजपच्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांसाठी हा एक धक्का मानला जात आहे.

महंत आणि बाबाचे नाव आघाडीवर

हिंदूत्ववादी चेहरा आणि भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून बालकनाथ यांना ओळखले जाते. खासदार बालकनाथ यांना भाजपने विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरवले होते आणि ते विजयी झाले आहेत. यांच्यासह पेपर फुटी प्रकरणासह इतर काही प्रकरणावर गेहलोत सरकारला सळे की पळो करून सोडणारे किरोडी लाल मीणा यांचे नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मीणा यांना बाबा या नावानेही ओळखले जाते. या दोन्ही आमदारांच्या नेत्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर मुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून जोरदार समर्थन करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रक्ताने लिहिले पत्र

मुख्यमंत्री पदासाठी खलबते सुरू असतानाच किरोडीलाल मीणा यांच्या एका समर्थकाने थेट रक्ताने पत्र लिहून त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. राजस्थानमधील करौळी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रतापसिंह कोडयाई नावाच्या भाजप कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहित म्हटले आहे की, किरोडी लाल मीणा यांनी राजस्थान सरकारच्या विरोधात आवाज उठवत भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडले. पेपर फुटी प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली यासह विविध मुद्यांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत. प्रसंगी रस्त्यावर झोपून दिवस काढले आणि जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे अशा नेत्यास राजस्थानचा मुख्यमंत्री केले पाहिजे अशा आशय़ाचे पत्र पंतप्रधान मोदी यांना लिहले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कोण आहेत किरोडी लाल मीणा?

सध्या किरोडी लाल मीणा, ओम माथूर, वसुंधरा राजे , महंत बालकनाथ यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. यामध्ये किरोडीलाल मीणा आणि वसुंधरा राजे यांच्यात अंतर्गत कलह असल्याचेही बोलले जाते. राज्यसभा खासदार असलेले मीणा हे राजस्थानातील एक मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. एक शेतकरी नेता म्हणून त्यांची राजकीय ओळख आहे. किरोडी लाल मीणा यांनी आत्तापर्यंत अनेकांना सरकार दरबारी न्याय मिळवून दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांच्या नावाचा समावेश असला तरी किरोडी लाल मीणा यांनी आपण या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT