boy voting eight times uttar pradesh  sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : काय सांगता! पठ्ठ्यानं भाजपला आठ वेळा केलं मतदान

Akshay Sabale

Uttar Pradesh News, 20 May : देशात लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होतात. यातच उत्तर प्रदेशात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच व्यक्तीनं एक नाही, दोन नाही, तर तब्बल आठ वेळा भाजपला मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील एटामध्ये ही घटना समोर आली आहे. एका युवकानं 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे प्रकरण समोर आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागांव पोलिस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव राजन सिंह असून तो खिरियातील पमारान येथील रहिवाशी आहे. राजन सिंहला अटक केली आहे.

या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यासह राजन सिंहनं ज्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला होता, तेथील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

व्हिडीओत काय? अखिलेश यादव यादव काय म्हणाले?

व्हिडीओत एक युवक ईव्हीएमजवळ उभा आहे. या युवकानं भाजपला 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ 'एक्स' अकाउंटवर शेअर केला आहे. "निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल, तर काहीतरी कारवाई करावी. अन्यथा... भाजपची कमिटी ही खरे तर लूट कमिटी आहे," असा निशाणा अखिलेश यादव यांनी साधला आहे.

"अधिकाऱ्यांनी घटनात्मक जबाबदारी विसरू नये"

काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. "भाजपला आपला पराभव दिसत आहे. जनादेश नाकारण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला सामोरे जाताना आपली घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. नाहीतर सरकार स्थापन होताच, अशी कारवाई केली जाईल की भविष्यात कोणीही 'संविधानाच्या शपथेचा' अवमान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल," असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT