Lok Sabha Session Sarkarnama
देश

Lok Sabha : वादविवादात गमविले तास; संसद अनिश्चित काळासाठी स्थगित, कोट्यवधींची बचत

Sachin Deshpande

National Politics : सतराव्या लोकसभेत खासदारांनी किती तास काम केले, यापेक्षा किती तास त्यांनी वाया घालविले, यावर चर्चा अधिक होईल. लोकसभा सदस्यांनी 387 तास हे केवळ गडबड, गोंधळ आणि वादविवादात गमविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे लोकसभेचा बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. 25 मे 2019 रोजी सतरावी लोकसभा स्थापित करण्यात आली होती. अठरावी लोकसभा 24 मे 2024 पूर्वी स्थापित होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वी निवडणूक होऊन निकालदेखील लागलेले असतील.

लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा शनिवारी (ता. 10) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. त्याला इंग्रजीत Sine Die असा शब्द आहे. हा फक्त पाच वर्षांतून संसदेच्या शेवटच्या सत्राचा अंतिम शब्द असतो. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वंदे मातरम् गायनानंतर संसद अनिश्चित काळासाठी स्थगित, अशी घोषणा हिंदीतून केली.

अनुदान रद्द

सतराव्या लोकसभेत खासदारांना ‘सबसिडीवर’ लोकसभा ‘कॅन्टिन’मधील भोजन आणि नाश्ता थांबविण्यात आला. त्यामुळे दरवर्षी 15 कोटींची बचत झाली. पाच वर्षांत लोकसभा खासदारांनी जवळपास 75 कोटी रुपयांची बचत केली आहे. सतराव्या लोकसभेची स्थापना 25 मे 2019 रोजी झाली. त्यानंतर 17 जूनला लोकसभेची पहिली बैठक आणि 19 जून 2019 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची निवड झाली.

खर्चात कपात

सतराव्या लोकसभेत संसदेच्या नव्या इमारतीत खासदारांचा प्रवेश झाला. गेल्या 75 वर्षांत दरवर्षी राष्ट्रीय उत्सवांनिमित्त रोषणाईवर होणारा खर्च वाचविण्यात आला. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा निधी वाचल्याचा दावा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला. संसदेचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्यात यश आले आहे. भविष्यात संसद आणि विविध राज्यातील विधानसभांचे कामकाज संसदेच्या ‘प्लॅटफॉर्म’वरून दिसण्याचा विचार सुरू असल्याचे बिर्ला म्हणाले. हे नियोजन लवकरच पूर्ण होईल, असा त्यांचा दावा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोविड संकटात दोन वर्षे गेल्यानंतरदेखील संसदेची कार्यशक्ती (उत्पादकता) ही 168 टक्के इतकी होती. नवीन संसद भवन हे विक्रमी वेळेत केवळ दोन वर्षे पाच महिन्यांत उभारण्यात आले. 540 खासदार या लोकसभेत सहभागी झाल्याचे ओम बिर्ला म्हणाले. लोकसभेच्या 274 बैठकी झाल्या, ज्याचे कामकाज 1 हजार 354 तास झाले. 354 तास अधिक काम लोकसभेत केले गेले. वादविवाद आणि तणावात लोकसभेचे 387 तास वाया गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शून्य प्रहराचा विक्रम

लोकसभेत 222 कायदे पारित करण्यात आलेत. 202 विधेयक मांडले गेले. 11 विधेयक सरकारला मागेदेखील घ्यावे लागले. 4 हजार 663 तारांकित प्रश्न सूचीबद्ध करण्यात आलेत. त्यापैकी 1 हजार 116 प्रश्नांची मौखिक उत्तरे देण्यात आलीत. शून्य प्रहारात विक्रमी 5 हजार 568 प्रश्न, मुद्दे उपस्थित केले गेले, जो एक विक्रम आहे. विविध देशांचे 16 शिष्टमंडळ संसदेत आले. एकाच दिवशी 18 जुलै 2019 रोजी शून्य प्रहरात 161 विषय मांडले गेले. हा मोठा विक्रम होता. लोकसभेत खासदार रात्रीपण उपस्थित होते.

लोकसभेच्या कार्यकाळात 729 गैरसरकारी विधेयक खासदारांनी मांडले. तीन संविधान संशोधन विधेयक मंजूर केले गेले. नारीशक्ती वंदन विधेयक, मुस्लिम महिलांसाठी हक्काचे विधेयक, भारतीय न्याय संहिता, साक्ष आदींची मंजुरी प्रदान करण्यात आली. जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयक सतराव्या लोकसभेत मंजूर करण्यात आले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT