Asaduddin Owaisi Sarkarnama
देश

Malegaon Blast Case Verdict : ‘मालेगाव’चा निकाल लागताच ओवेसींनी हेमंत करकरे, सालियन यांचा मुद्दा काढला उकरून

Asaduddin Owaisi statement : मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेवर त्वरीत स्थगिती मागणारे मोदी व फडणवीस सरकार या प्रकरणातही अपील करणार का?, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

Rajanand More

Malegaon bomb blast case : मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व सात आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. त्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निकालावर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी हेमंत करकरे आणि रोहिणी सालियन यांचाही मुद्दा उकरून काढला आहे.

ओवेसी यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना सवाल केला आहे. त्यांनी पाच मुद्द्यांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. या स्फोटात सहा नमाज पढणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता. धर्मामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. तपासातील निष्काळजीपणा आणि कमकुवत पुराव्यांमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

कोर्टाने पुराव्यांअभावी 17 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आता मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेवर त्वरीत स्थगिती मागणारे मोदी व फडणवीस सरकार या प्रकरणातही अपील करणार का? या हल्ल्यातील सहा जणांची हत्या कुणी केली, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी महाराष्ट्रातील "धर्मनिरपेक्ष" राजकीय पक्ष करणार का, असे सवाल ओवेसी यांनी केले आहेत.

आरोपींविरुध्द सॉफ्ट राहण्याचे आपल्याला एनआयएकडून सांगण्यात आले होते, असे तत्कालीन सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी 2016 मध्ये स्पष्टपणे सांगितल्याचा दावाही ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचाही मुद्दा काढला.

मालेगाव कटाचा उलगडा करकरे यांनी केला होता. दुर्दैवाने ते 26/11 च्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी भाजप खासदाराने म्हटले होते की, त्यांनी करकरे यांना शाप दिला होता आणि त्यांचा मृत्यू त्याच शापाचा परिणाम होता, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

एनआयए आणि एसटीएसच्या अधिकाऱ्यांना तपासातील निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरले जाणार का, असा सवाल करत ओवेसी यांनी याचे उत्तर आपल्याला माहित आहे, असेही म्हटले आहे. हे आहे ‘दहशतवादावर कठोर कारवाई’ करणारे मोदी सरकार. त्यांनी एका दहशतवादी आरोपीला खासदार बनविल्याचे जग लक्षात ठेवेल, असे ओवेसी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT