देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतची खास आठवण तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांनी पहिल्यांदाच सांगितली आहे. ही आठवण २०१२ मधील असून त्यावेळी एस. वाय. कुरेशी हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यावेळी एका घटनेनंतर पंतप्रधानांनी त्यांना आपल्या घरी बोलवून 'मी आत्महत्या करेन' असे त्यांच्यासमोर म्हटले आहे.
कुरेशी यांनी India and I: A Hundred Memories, Not a Memoir हा पुस्तकामध्ये या प्रसंगाची आठवण सांगितली आहे. दिवंगत मनमोहन सिंग हे मितभाषी होते. त्यामुळे कुरेशी यांना घरी बोलवून ते थेट आत्महत्येबाबत का बोलले, यामागचा किस्सा कुरेशी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केला आहे. निवडणूक आयोगाविषयीचे मनमोहन सिंग यांचे मतही त्यांनी अधोरेखित केले आहे. 'NDTV' ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशच्या २०१२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत एक घोषणा केली होती. राज्यात सत्तेत आल्यानंतर नोकरीमध्ये मुस्लिमांचे आरक्षण ४.५ टक्क्यांवरून ९ टक्के वाढविले जाईल, असे खुर्शिद यांनी एका प्रचार सभेत जाहीर केले होते.
भाजपने याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा भाजपने केला होता. आयोगाने चार दिवस या तक्रारीवर सुनावणी घेतली. काँग्रेसकडून अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून अरुण जेटली यांनी बाजू मांडली. अखेरीस निवडणूक आयोगाने सलमान खुर्शिद यांना फटकारले होते, असे कुरेशी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
आयोगाच्या या भूमिकेवर नाराज झालेल्या खुर्शिद यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांकडून निवडणूक आयोग अंहकारी आहे, मनमानी करत असल्याची टीका सुरू झाली होती. त्यावर कुरेशी यांनी म्हटले आहे की, टीकेला मला कधी त्रास होत नाही. पण जेव्हा संस्थांची विश्वासार्हता कमजोर करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते चिंताजनक असते.
पंतप्रधानांनी घरी बोलावले पंतप्रधानांचे तत्कालीन प्रेस सचिव हरीश खरे आणि कुरेशी यांच्या वार्षिक ईद मिलन कार्यक्रमात भेट झाली होती. यावेळी कुरेशी यांना याबाबत सांगितले होते. त्यानंतर पुढच्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयातून कुरेशी यांना फोन गेला. स्वत: पंतप्रधान फोनवर होते. सायंकाळी ७ वाजता दोघांची भेट ठरली.
कुरेशी हे पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाल्यानंतर मनमोहन सिंग हे व्यथित असल्याचे दिसले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यथित होऊनच म्हटले की, 'म्ही काय म्हणालात, ते हरीशने मला सांगितलं. तुम्ही जर असा विचार करत असाल तर मी आत्महत्या करेन,' असे कुरेशी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
पंतप्रधान यांचे हे विधान ऐकून आपण स्तब्ध झाल्याचे कुरेशी सांगतात. आपली तक्रार काही मंत्र्यांच्या वागणुकीवर होती, पंतप्रधानांविषयी नव्हती. पण मनमोहन सिंग हे निवडणूक आयोगाला नेहमीच भारताचा गौरव मानत होते. आपल्या भूमिकेवर शंका घेणेही त्यांना सहन झाले नाही, असे कुरेशी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयी पुस्तकात लिहिले आहे.
काहीवेळाने मनमोहन सिंग यांनी आपल्याला याबाबत अजिबात माहिती नव्हते, असे सांगत म्हटले होते की, 'मला माहिती असते तर मीच त्यांना (मंत्री, नेते) फटकारले असते. भविष्यात तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट मला फोन करा. निवडणूक आयोग म्हणजे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आपण त्यालाच हरवून बसलो तर सगळंच हरवून बसेल. ' मनमोहन सिंग यांच्या या भेटीबाबत कुरेशी यांनी पुढे लिहिले आहे की, या घटनेमुळे आपल्याला प्रभावित केले. राजकारणाने नव्हे नेत्यामुळे. अशा नेत्याने आपल्याला प्रभावित केले जे सत्तेत असूनही संविधानिक संस्थांविषयी संवेदनशील आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.