Manmohan Singh- pandit Nehru -Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi Special Session : नेहरूंपासून मनमोहनसिंगांपर्यंतच्या पंतप्रधानांचे मोदींनी केले कौतुक...

Vijaykumar Dudhale

New Delhi : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनातील आठवणींना उजाळा दिला. या भाषणात मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंगांपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या कामांचे कौतुक केले. याशिवाय पदावर असतानाच देशाने तीन पंतप्रधानांना गमावले याचीही आठवण सांगितली. तसेच, लोकसभेचे पहिले सभापती ग. वा. मावळणकर यांचे स्मरण मोदींनी केले. (Modi praised Prime Ministers from pandit Nehru to Manmohan Singh....)

संसदेच्या विशेष अधिवेशनात नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून डॉ. कलाम यांच्यापर्यंत तसेच रामनाथ कोविंद यांच्यापासून द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. पंतप्रधान पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयींपासून डॉ. मनमोहनसिंगांपर्यंत अनेकांनी सभागृहाचे नेतृत्व केले. सभागृहाच्या माध्यमातून देशाला दिशा दिली. देशाला पुढे नेण्यासाठी त्यांनी काम केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया, अडवाणी यांसारख्या नेत्यांनी सभागृहाला समृद्ध करण्याचे काम केले आहे. जगातील अनेक राष्ट्रध्यक्षांनी आपल्या देशाचे कौतुक केले.

देशाने आपल्या तीन पंतप्रधानांना पदावर असताना गमावले. अश्रूंनी भरलेल्या संसदेने त्यांना निरोप दिलेला आहे. आजपर्यंतच्या दोन्ही सभागृहांच्या सभापतींनी अधिक चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अनेक सभापतींच्या निर्णयाचा आजही कामकाज चालविताना आधार घेतला जातो. लोकसभेचे पहिले सभापती ग. वा. मावळणकर यांच्यापासून ओम बिर्लापर्यंत अनेकांची वेगळी शैली राहिली आहे; पण या सर्वांनी नियमांच्या अधीन राहून काम केले आहे, अशी आठवणही त्यांनी कथन केली.

पंतप्रधान म्हणाले की, सदस्यांबरोबरच सभागृहातील सहायकही आपली भूमिका चोख निभावतात. आता अनेकांच्या पुढच्या पिढ्या आल्या आहेत. त्यांचेही आजपर्यंतच्या कामात योगदान आहे. त्यांच्या पूर्वजांचेही मी आभार मानतो. अनेकांनी संसदेच्या कामकाजात योगदान दिले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. त्या सर्वांचे मी आभार मानतो.

संसद इमारतीवर अतिरेक्यांचा हल्ला झाला. तो हल्ला इमारतीवर नव्हता, तर ‘मदर ऑफ डेमोक्रसी’वर होता. तो आमच्या जीवात्मावर हल्ला होता. देश त्या घटनेला कधीही विसरणार नाही. पण दहशतवाद्यांशी लढताना संसदेला वाचविण्यासाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, त्यांनाही मी नमन करतो. आज ते हयात नाहीत, पण त्यांनी आपल्या सर्वांची सुरक्षा केली आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

मोदींनी ठेवली पत्रकारांची आठवण

आज संसदेची जुनी इमारत सोडताना पत्रकारांची आठवण ठेवतो. अनेकांनी आयुष्यभर केवळ संसदेचेच वार्तांकन केले आहे. ते देशाच्या कामकाजाचे साक्षीदार राहिले आहेत. त्यांचे सामर्थ्य एवढं आहे, की काहीजण केवळ आतल्याच नाही तर त्याच्या आतल्या गोष्टीही बाहेर काढतात. अनेक पत्रकरांनी सांगितलेल्या गोष्टी आर्श्चयकारक राहिल्या आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञभाव व्यक्त करतो, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT