NCP Merger: दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेला येत आहे. त्यातच आज पवार कुटुंबीय हे विविध कारणांसाठी दिल्लीत पोहोचले पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. त्यामुळं या विलिनीकरणाला आता वेग येत असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही सध्या दिल्लीतच आहेत.
दिल्लीला रवाना झालेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार तसंच खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि रोहित पवार हे देखील दिल्लीतमध्ये पोहोचले आहेत. ही सर्व पवार कुटुंबातील मंडळी वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळं दिल्लीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत महत्वाची चर्चा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत असल्याचं साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी पुत्र पार्थ आणि जय पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या भेटीचा तपशील सांगताना तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर सुनेत्रा वहिनी आज दिल्लीमध्ये आल्या. पंतप्रधान, गृहमंत्र्यांची त्यांची भेट झाली त्याचबरोबर दादांच्या अकाली निधनाप्रती संवेदना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी दोन्ही बड्या नेत्यांनी आमच्या पाठीशी असल्याचं आश्वस्त केलं.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले, "विलिनीकरणाबाबत आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे! मी वारंवार हे सांगितलं आहे की, विलिनीकरण कुठल्या पक्षात होणार? आम्ही भाजपप्रणित एनडीएचा घटकपक्ष आहोत. तर दुसरी राष्ट्रवादी ही काँग्रेसप्रणित युपीएची घटकपक्ष आहे. अजितदादा असतानाच त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की, आम्ही एनडीएसोबत गेलो आहोत, आजही एनडीएत आहोत आणि भविष्यातही एनडीएतच राहू. त्यामुळं आमच्यासोबत यायच असेल तर त्यांना एनडीएसोबत येण्याची स्पष्टता कोणीतरी करणं अपेक्षित आहे. जर एनडीएसोबत येण्याची शरद पवारांची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत करणार का? या प्रश्नावर तटकरे म्हणाले, जर तर वर मी कसं बोलणार? आपल्या सर्वांना हे माहिती आहे की, २०१४ पासून २०१९ पासून भाजपसोबत आपण सरकारमध्ये असावं अशी अजित पवारांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व बैठकांमध्ये ते ही भूमिका स्पष्टपणे मांडत होते"
दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा एकत्रितपणे शपथविधीही पार पडला होता. त्यावेळी देखील अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की तीन पक्षांचं सरकार असण्यापेक्ष दोन पक्षांचं सरकार विशेष करुन भाजप-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेईल, अशी दादांची भूमिका त्यावेळी होती. २०२३ मध्ये जेव्हा वारंवार भाजपसोबत जाण्याबाबत पक्षात चर्चा होऊनही निर्णय होत नसल्यानं आमचा एनडीएसोबत सहभाग झाला. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सांगितली पण इतरांनी राजकीय भूमिका काय घ्यावी, कुठल्या पक्षासोबत त्यांनी जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळं त्याविषयी मी काही बोलणार नाही, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर स्वतःची आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.