थोडक्यात महत्वाचे :
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात झालेल्या युवकांच्या आंदोलनानंतर हिंसाचार भडकला, ज्यात 20 आंदोलकांचा मृत्यू आणि शेकडो जखमी झाले.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री रमेश लेख आणि कृषिमंत्री रामनाथ अधिकारी यांनी पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत राजीनामा दिला.
मित्रपक्ष नेपाळी काँग्रेसने ओलींच्या राजीनाम्याची मागणी केली असून सरकारपासून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे.
Future of Nepal’s Government After Gen Z Protest : युवकांच्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आंदोलनानंतर काही तासांतच दोन केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला असून देशातील सरकार धोक्यात आले आहे. लोकशाही मुल्यांचे पालन करण्याऐवजी सरकार हुकूमशाहीच्या मार्गाने जात असल्याचा गंभीर आरोप करत मंत्र्यांनीच पंतप्रधान के. पी. ओली यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्या खळबळ उडाली आहे.
नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी देशात फेसबूक, व्हॉट्सअपसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. त्याला शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला. त्याचे रुपांतर सोमवारी हिंसक आंदोलनात झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. त्यामध्ये 20 आंदोलकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. त्यामुळे नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटू लागल्यानंतर गृहमंत्री रमेश लेख यांनी काही तासांतच सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवार सायंकाळी त्यांनी पंतप्रधान ओली यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी कृषिमंत्री रामनाथ अधिकारी यांनीही पदाचा राजीनामा देत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसचे महासचिव गगन थापा यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निर्दोष युवकांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधांनांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, असे थापा म्हणाले. आंदोलकांकडून आता पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आंदोलनादरम्यान सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उचलून धरण्यात आला होता.
नेपाली काँग्रेसने सरकारमधून बाहेर प़डण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. या स्थितीत नेपाळी काँग्रेस सहभागी होऊ शकत नाही. पक्षाच्या बैठकात हा मुद्दा उपस्थित करून सरकारपासून वेगळे होण्याबाबत चर्चा होईल, असेही थापा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या ओली सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली आहे.
Q1: नेपाळमध्ये आंदोलन का सुरू झाले?
A: सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे.
Q2: आंदोलनात किती लोकांचा मृत्यू झाला?
A: २० आंदोलकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले.
Q3: कोणत्या मंत्र्यांनी राजीनामा दिला?
A: गृहमंत्री रमेश लेख आणि कृषिमंत्री रामनाथ अधिकारी.
Q4: नेपाळी काँग्रेसने काय भूमिका घेतली आहे?
A: पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची मागणी केली असून सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.