
थोडक्यात महत्वाचे :
सुप्रीम कोर्टाने भाजप नेत्यांची मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या विरोधातील मानहानी याचिका फेटाळून लावली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट संदेश दिला – "राजकारणात असाल तर टीका-टिप्पणी सहन करण्याची ताकद हवी."
हायकोर्टाप्रमाणेच सुप्रीम कोर्टानेही राजकीय भाषणे अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतात, त्यांना मानहानी म्हणून पाहता येत नाही, असे स्पष्ट केले.
Political Impact of Supreme Court’s Decision : राजकीय नेत्यांकडून एकमेकांविरोधात अनेकदा टीका, गंभीर आरोप केले जाते. त्यावरून मोठा वादही निर्माण होतो. कोर्टात मानहानीच्या याचिका दाखल केल्या जातात. सध्या काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात देशातील विविध कोर्टात मानहानीच्या याचिका दाखल आहेत. इतर पक्षांतील नेत्यांविरोधातही अशा याचिका आहेत. अशीच एक याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली.
भाजपच्या तेंलगणातील नेत्यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. हा दावा हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण ही याचिका सुनावणीला येताच सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस कारम वेंकटेश्वरलू यांनी रेड्डी यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. रेड्डी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान टीका करताना भाजपला 400 जागा मिळाल्यास एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण संपवून टाकतील, असे विधान केले होते. त्याविरोधात वेंकटेश्वरलू यांनी दावा केला होता. हा दावा हायकोर्टाने फेटाळला होता.
सुप्रीम कोर्टासमोर ही याचिका येताच याचिकाकर्त्यांचे वकील रंजित कुमार यांना सरन्यायाधीश गवई यांनी थेट याचिका फेटाळल्याचे सांगितले. त्यावर कुमार यांनी हे प्रकरण उचलून धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले, न्यायालयांचे रुपांतर राजकीय युध्दभूमीत होऊ शकत नाही, हे आम्ही वारंवार सांगितले आहे.
कुमार यांनी हे प्रकरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी सूचक संदेश दिला. ते म्हणाले, ‘तुम्ही राजकारणात असाल तर टीका-टिप्पणी सहन करण्याची ताकद हवी.’ (If you are in politics, you should have a thick skin). त्यानंतर सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली.
हायकोर्टानेही भाजप नेत्याची याचिका फेटाळताना असेच निरीक्षण नोंदवले होते. राजकीय भाषणे अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतात. अशी भाषणे बदनामीकारक आहेत असा आरोप करणे ही आणखी एक अतिशयोक्ती आहे, असे विधान हायकोर्टाने केले होते. भाजप नेत्याची याचिका फेटाळून लावण्याची मागणी करणारी याचिका रेवंथ रेड्डी यांनी हायकोर्टात केली होती.
Q1: कोणत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने भाजपची याचिका फेटाळली?
A: मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केलेल्या निवडणूक काळातील वक्तव्यावर दाखल झालेल्या मानहानीच्या प्रकरणात.
Q2: सरन्यायाधीश गवईंनी काय विधान केले?
A: "राजकारणात असाल तर टीका-टिप्पणी सहन करण्याची ताकद हवी."
Q3: हायकोर्टाने याचिकेबाबत काय निरीक्षण केले होते?
A: राजकीय भाषणे अतिशयोक्तीपूर्ण असतात; त्यांना बदनामी म्हणणे हीसुद्धा अतिशयोक्ती आहे.
Q4: भाजप नेत्याने कोणत्या विधानावरून याचिका दाखल केली होती?
A: रेड्डी यांनी केलेल्या "भाजप 400 जागा जिंकल्यास आरक्षण संपवेल" या वक्तव्यावरून.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.