Narendra Singh Tomar, Pralhad Patel, Rajyavardhan singh Rathore Sarkarnama
देश

BJP : खासदारकी गेली, आता घरे खाली करा; भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना नोटीस

Anand Surwase

Narendra Singh Tomar : केंद्रातील सत्ताधारी भाजपने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 खासदारांना तिकीट देऊन मैदानात उतरवले होते. त्यापैकी विजयी झालेल्या भाजपच्या 12 खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या खासदारांचा राजीनामा मंजूर होताच आता त्यांना त्यांची शासकीय घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने शुक्रवारी राजीनामा दिलेल्या खासदारांना या संदर्भातील नोटीस पाठवली आहे.

देशात छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालात भाजपने तीन राज्यांत आपली सत्ता स्थापन केली, तर तेलंगणा आणि मिझोरममध्ये चांगली कामगिरी करत आमदारांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी 21 खासदारांना तिकीट दिले होते. त्यामध्ये तीन मंत्र्यांचाही समावेश होता. त्यापैकी राजस्थानात 7 आणि मध्य प्रदेशात 7 तसेच तेलंगणामध्ये 3 आणि छत्तीसगडमधील 4 खासदारांचा समावेश होता.

देशातील या विधानसभा निवडणुसाठी 3 डिसेंबरला निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपचे एकूण 12 खासदार विजयी झाले. त्यामुळे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विजयी झालेल्या खासदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांत विजयी झालेल्या सर्व खासदार आणि मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. गुरुवारी त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

30 दिवसांत घरे खाली करा

खासदारकीचा राजीनामा मंजूर झालेल्या सर्व सदस्यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने आपले सरकारी बंगले खाली करण्याची नोटीस दिली आहे. यासाठी खासदारांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजप सरकारच्या या नोटिशीमुळे नियम सर्वांसाठी सारखेच असल्याचा संदेश दिला गेला आहे. आाता मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्रसिंह तोमर, रेणुका सिंह यांच्यासह खासदार राकेश सिंह, उदय प्रताप, रिती पाठक, अरुण साव, गोमती साई, राजवर्धन सिंह राठोड, बालकनाथ, दिया कुमारी, किरोडी लाल मीणा यांना आपली घरे खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

आमदार म्हणून निवडून गेलेल्या खासदारांना भाजप नेतृत्वाकडून त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने अद्यापही छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची आणि मंत्रिमंडळाची नावे निश्चित केलेली नाहीत. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT