BJP Flags
BJP Flags  Sarkarnama
देश

देशातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर फडकणार ६ एप्रिलला पक्षाचा झेंडा...

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वर्धापनदिनानिमित्त (BJP anniversary) (६ एप्रिल) देशभरात जंगी कार्यक्रमांचा बार उडविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenda Modi) यांचे पक्षकार्यकर्त्यांना संबोधन हे यंदाच्या वर्षीचे मुख्य आकर्षण असेल. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, (J.P. Nadda) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे दोघेही देशभरातील प्रमुख पक्षनेत्यांशी संपर्क साधून वर्धापनदिन तयारीचा राज्यवार आढावा घेत आहेत.

वर्धापनदिन सोहळ्याच्या तयारीबाबत नड्डा यांनी आज (ता.4 एप्रिल) पक्षाचे महासचिव व अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱयांशी चर्चा केली. चार तासांहून जास्त काळ चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विनोद तावडे व पक्षाचे सारे महासचिव उपस्थित होते. उत्तर प्रदेश व गोव्यासह चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने फेरविजय मिळविल्याने पक्षकार्यकर्त्यांचा 'जोश हाय' आहे. यूपीतील यंदाचा विजय २०२४ मधील भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील यशाच्या हॅटट्रीकचे चिन्ह असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर यंदाचा भाजपचा वर्धापनदिन खास असणार आहे. जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने यंदाच्या वर्धापनदिनी प्रत्येक पक्षकार्यकर्त्याने स्वतःच्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा, अशी कल्पना मांडली आहे. यानिमित्ताने ६ एप्रिलला देशातील कोट्यवधी घरे व कार्यालयांवर भाजपचे ध्वज फडकावेत व देशभरात प्रत्येक गाव, प्रत्येक शहर व प्रत्येक महानगरातील वातावरण 'भाजपमय' व्हावे अशी कल्पना आहे.

दिल्लीतील तीन मूर्ती भवनाच्या परिसरातील नेहरू संग्रहालयाचे नाव मोदी सरकारने नुकतेच बदलले त्यावरून टीकेची झोड उठली. मोदी व केंद्र सरकार अटलबिहारी वाजपेयी वगळता यापूर्वीच्या साऱ्या पंतप्रधानांचे योगदान नजरेआड करतात, त्यांच्याबाबत तुच्छतेने बोलतात, असा आरोप सातत्याने केला जातो. नेहरू व गांधी घराण्यावर मोदी व भाजपच्या टीकेचा विशेष रोख असतो, असेही विरोधक सांगतात. मात्र वस्तुस्थिती तशी अजिबात नाही हे जगाला दाखवून देण्यासाठी तीन मूर्ती भवनाच्या परिसरात एक भव्य संग्रहालय बनविण्यात येत आहे. यात साऱ्या माजी पंतप्रधानांच्या काळात देशाने कोणत्या ठळक योजना राबविल्या व त्यांच्या काळात देशाची कशी प्रगती झाली याची साद्यंत माहिती या संग्रहालयाद्वारे देण्यात येणार आहे. त्याचेही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यंदाच्या वर्धापनदिनाला सामाजिक न्यायाच्या संकल्पनेबरोबर जोडण्याचाही भाजपचा मनोदय आहे. यानिमित्त ६ ते १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) हा सामाजिक सद्भाव सप्ताह म्हणून देशभरात साजरा करण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने काढला आहे. यात गरीब वस्त्यांमध्ये जाऊन सेवाकार्य, भाजपची आणि मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती गरीब वस्त्या व ग्रामीण, दुर्गम भागांत घराघरांपर्यंत पोचवावी, असे निर्देश सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदार व सर्व लोकप्रतीनिधींना देण्यात आला आहे. शक्य झाल्यास खासदारंनी एखाद्या दुर्गम गावात मुक्काम करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे

वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे सारे प्रमुख नेते देशातील व साऱ्या राज्यांतील प्रमुख वृत्तपत्रांत त्या त्या भाषांत विशेष लेख लिहीणार आहेत. त्याचीही जबाबदारी प्रमुख पक्षनेत्यांना वाटून देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या योजनांबाबत व जनसंघापासून भाजपच्या वाटचालीबाबत या लेखांमध्ये भर द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या राजधान्या व देशातील साऱ्या महानगरांत मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनांबाबत पत्रकार परिषदाही घेण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT