Pakistan on Article 370 Sarakarnama
देश

Pakistan on Article 370 : काँग्रेस - नॅशनल कॉन्फरन्सने 'कलम-370'बद्दल घेतलेल्या भूमिकेचे पाकिस्तानकडून समर्थन!

Mayur Ratnaparkhe

Congress-National Conference alliance and Pakistan on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. बुधवारीच दरम्यान, पाकिस्तानने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना कलम 370 वरून पाठिंबा दर्शवल्याचे समोर आल्याने त्यात अधिकच भर पडली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की कलम 370 पुन्हा लागू करण्याबाबत पाकिस्तान काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या सोबत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, आम्ही कलम 370बाबत काँग्रेस आघाडीच्या भूमिकेशी सहमत आहोत.

पाकिस्तानातील माध्यम प्रतिनिधीने एका कार्यक्रमात संरक्षणमंत्री ख्वाज आसिफ यांना विचारले की, 'शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांनी कलम 370 आणि 35A ठरवले होते. आता हे दोन्ही पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस निवडणुकीच्या प्रचारात सांगत आहेत की, जर आम्ही जिंकलो तर कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करू. तुम्हाला हे शक्य वाटतं का?'

या प्रश्नावर उत्तर देताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, मला वाटतं की हे शक्य आहे. काँग्रेस(Congress) आणि नॅशनल कॉन्फरन्स दोघांची उपस्थिती लक्षणीय आहे. या मुद्य्यावर मला वाटतं की, काश्मीर खोऱ्यातील जनता खूप प्रेरित झाली आहे, अगदी खोऱ्याच्या बाहेरील जनताही. ते सत्तेत येण्याची मोठी शक्यता आहे. त्यांनी दर्जा पुन्हा मिळायला हवा, हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. जर दर्जा पुन्हा लाभला तर मला वाटतं की काश्मिरी लोकांच्या जखमा काही प्रमाणात भरून निघतील.

यानंतर पत्रकारने त्यांना काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचे वक्तव्य दर्शवून विचारले, की काँग्रेस म्हणत आहे की हा हक्क आम्ही मिळवून देवू. तर मग आपण असं म्हणू शकतो का, की आज पाकिस्तानचे सरकार आणि भारतातील काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स(National Conference) एकाच विचारावर आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, या मुद्य्यावर(कलम 370), अगदी. आमची मागणीही तीच आहे. जेव्हापासून मोदींनी हा वार केला आहे.. की काश्मीरचा दर्जा पुन्हा बहाल केला जावा.'

कलम 370 हटवणे आणि तत्कालीन राज्यांना दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करणे, जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी विशेषकरून काश्मीर खोऱ्यातील लोकांसाठी एक भावनात्मक मुद्दा बनलेला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि महबूबा मुफ्ती यांची पीडीपी यांच्या जाहीरनाम्यात कलम 370 बहाल करण्याचा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट केला आहे.

भाजपचा हल्लाबोल -

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या या विधानामुळे भाजपला काँग्रेसवर टीका करणयास चांगलाच मुद्दा सापडला आहे. भाजप(BJP) नेते अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष नेहमीच त्या लोकांच्या बाजूने दिसतो जे भारताच्या हिताच्या विरोधातील आहेत. तसेच त्यांनी हेही म्हटले की, पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे. काश्मीरच्या मुद्य्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे. असं कसं काय आहे, की गुरपतवंत पन्नू पासून ते पाकिस्तानपर्यंत राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष नेहमीच त्या लोकांच्या बाजूने दिसून येतो, जे भारताच्या विरोधातील आहेत?'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT