UP Election 2020
UP Election 2020 sarkarnama
देश

ऐतिहासिक मतदारसंघ; ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो त्यांचीच राज्यात सत्ता येते!

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकाचा (UP Election 2022) प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप (BJP), समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्षासह इतर सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. भाजप व समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) आपलीच सत्ता येणार, असा दावा केला जात आहे. पण उत्तर प्रदेशात एक असा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो, त्याच पक्षाची राज्यात सत्ता येते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर (Hastinapur) हा तो मतदारसंघ आहे. 1957 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वा आल्यानंतर पहिली निवडणूक काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराने जिंकली. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता आली. तर 2017 मध्ये भाजपचा उमेदवार पहिल्यांदाच या मतदारसंघात विजयी झाला अन् योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुख्यमंत्री झाले. बसपा, समाजवादी पक्षाची सत्ता आली त्यावेळी या मतदारसंघात त्यांचेच उमेदवार विजयी झाले आहे.

हस्तिनापूर ही पांडवांची राजधानी होती, असं मानलं जातं. या मतदारसंघात 1957 मध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वंभर सिंग विजयी झाले. त्यावर्षी काँग्रेसचे संपूर्णानंद मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1962 आणि 1967 मध्ये दोन्हीवेळा काँग्रेसच्या उमेदावाराने विजय संपादन केला अन् राज्यात काँग्रेसची सत्ता आली. 1969 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. भारतीय क्रांती दलाच्या आशा राम इंदू यांचा विजय झाला होता. त्यावेळी क्रांती दलाचे चौधरी चरण सिंग मुख्यमंत्री बनले. ते 1967 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

काँग्रेसने 1974 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेतला. रेवती रमण मौर्य यांनी विजय मिळवल्यानंतर काँग्रेसकडून हेमवती नंदन बहुगुणा मुख्यमंत्री झाले. 1977 मध्ये रेवती मौर्य यांनी जनता पक्षाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. यावेळी जनता पक्षाचे नेते राम नरेश यादव मुख्यमंत्री बनले. 1980 मध्ये काँग्रेसचे झग्गर सिंग विजयी झाले आणि राज्यात पुन्हा काँग्रेसने सत्ता मिळवली. त्यावेळी विश्वनात प्रताप सिंग यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

1985 मध्ये पुन्हा काँग्रेसनेच हस्तिनापूरवर कब्जा मिळवला आणि एन. डी. तिवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री नबले. त्यानंतर या मतदारसंघातून एकदाही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. 1989 च्या निवडणुकीत जनता दल (सोशलिस्ट)ची राज्यात सत्ता आली. या पक्षाच्या झग्गड सिंग यांनी मतदारसंघात विजय मिळवला होता. या मतदारसंघात 11 व्या आणि 12 व्या विधानसभेसाठी निवडणूक झाली नाही.

1996 च्या निवडणुकीत बसपाचे (BSP) अतुल खाटिक विजयी झाली अन् राज्यात पहिल्यांदात बसपाची सत्ता आली. 2002 मध्ये समाजवादी पक्षाचे प्रभू दयार वाल्मिकी वजीय झाले होते. त्यावेळी वर्षभर मायावती (Mayawati) मुख्यमंत्री होत्या. पण त्यानंतर पुढील चार वर्ष मुलायमसिंग यादव मुख्यमंत्रिपदी राहिले. 2007 मध्ये पुन्हा बसपाने ही सीट जिंकल्याने मायावती मुख्यमंत्री बनल्या. 2012 मध्ये पुन्हा वाल्मिकी यांनी बसपाच्या उमेदवाराचा पराभव करत मायावतींची सत्ता घालवली.

2012 मध्ये अखिलेश यादव (Akhilesh Yadav) मुख्यमंत्री बनले. 2017 च्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत हस्तिनापूर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार पहिल्यांदाच विजयी झाला. भाजपचे उमेदवार दिनेश खाटिक यांनी बसपा उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीनंतर राज्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. यावर्षीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दिनेश खाटिक हे भाजपचे उमेदवार असून सपाकडून योगेश वर्मा रिंगणात आहेत. तर बसपाने संजीव जटाव आणि काँग्रेसने अर्चना गौतम यांना उमेदवारी दिली आहे. आता खाटिक पुन्हा विजय मिळवून योगींचा मार्ग सुकर करणार की वर्मा इतिहास घडवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT