Ajit Pawar, Sanjay Raut Sarkarnama
देश

Sanjay Raut On Ajit Pawar: निधीवाटपातील गोंधळ महाराष्ट्राचे राजकारण नासवणारे; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील फुटीरांवर कायम टीकेची झोड उठवणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांवर मात्र फारसे बोलले नव्हते. मात्र निधीवाटपाचा मुद्दा राऊतांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह शिंदे-फडणवीस सरकारविरोधात धार लावली आहे. निधीवाटपातील गोंधळ हा राज्याचे राजकारण नासवणारे असल्याचे सांगून राऊंतांनी पवारांवर घणाघात केला. राऊतांच्या या आक्रमक पवित्र्याने अजित गट संतप्त होऊन त्यांच्याविरोधात उतरण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

निधीवाटपानंतर राऊतांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना यापूर्वीही त्यांच्यावर झालेले आरोप खरे होत असल्याची नकळतपणे कबुलीही दिली आहे. निधीवाटपातून अपहार झाल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले,"माझ्या हातात तिजोरी आहे म्हणून मी लुटायचे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी असे आरोप झाले होते. महाविकास आघाडीच्या काळातही पवारच अर्थमंत्री होते त्यावेळीही या कुरबुरी होत्या. माझ्यासोबत असलेल्याच आमदारांचे खिसे भरेन, इतरांकडे दुर्लक्ष करणार असा निधी वाटपातील असमतोलामुळे महाराष्ट्राचे राजकारण नासवणारे आणि खराब करणारे आहे. आता कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाचा नवा प्रकार म्हणजे अपहारच आहे."

अर्थमंत्री पवार यांनी निधीवाटपात बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर वर्षाव केल्याची चर्चा आहे. यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटालांनाही मोठा निधी दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. यावर निधीवाटप हा संशोधनाचा विषय असल्याची मिश्किल टिपण्णीही संजय राऊतांनी यावेळी केली. "शरद पवार गटाचे अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडांना निधी दिला नाही, मात्र जयंत पाटलांना दिला आहे. राज्यातील निधी वाटप हा संशोधनाचा विषय असून यावर आता नीटपणे माहिती घ्यावी लागणार आहे. राज्यातील निधीवाटपाबाबत ठाकरे गटाचे रवींद्र वायकर न्यायालयात गेले आहेत", असेही राऊतांनी यावेळी सांगितेल.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदारांनी तुरुंगात जाण्याच्या भीतीतून पक्ष सोडल्याचे सांगत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठीच दोन्ही पक्षातील आमदार फुटल्याचा दावा करताना राऊत म्हणाले, लोक एका भीतीपोटी पक्ष सोडत आहेत. ज्यांनी पक्ष सोडले त्यांचा एक पाय तुरुंगातच होता, मग ते शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT