Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi News : पराभव होऊनही PM मोदी म्हणतात, 'जम्मू काश्मीरमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष...'; काय आहे कारण..?

Deepak Kulkarni

New Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत हरियाणात भाजप तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीनं बाजी मारली. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.यावेळी भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष करण्यात आला.

हरियाणामधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींना कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव करतानाच काँग्रेसवर सडकून टीका केली.तसेच यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधील मतांचं राजकारणावरही भाष्य केलं.

नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, तेथील नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला आमच्यापेक्षा जास्त जागा दिल्या.मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. हा भारताच्या लोकशाहीचा विजय आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जितके पक्षांनी निवडणूक लढवली. त्यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला गेला तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. तिथे दशकानंतर शांततेत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पडली. काहीजण जम्मू काश्मीरमधलं 370 कलम हटवल्यानंतर तिथे रक्ताचे पाट वाहतील असं म्हणत होते. पण जम्मू काश्मीर दिवसेंदिवस सुंदर होत चाललं आहे असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,भाजप सरकार गरीबांसाठी कटिबध्द आहे.भाजपवर गेल्या दहा वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही.हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये लोकांनी भाजपला प्रोत्साहन दिले. मी देशातील सर्व जनतेला शब्द देतो की, पुढील पाच वर्ष देशासाठी वेगवान विकासाचे असणार आहे.

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये मिळालेला जनादेश भारताला अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेल.हरियाणा आणि जम्मू काश्मीर विकसित राज्य होईल आणि आम्ही ते करुन दाखवू अशी ग्वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे, जेव्हा दोन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या सरकारला हरियाणात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजपला हरियाणात तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. इथल्या लोकांनी केवळ आपलं सरकार बनवलं नाही तर मते आणि जागाही जास्त दिल्या आहेत. हरियाणाच्या नागरिकांनी छप्पर फाड मते दिली आहे. या जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाणार आहे, असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT