Prashant Kishor: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या जनसुराज पक्षाचे सर्वोसर्वा आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आपण आपली सर्व संपती दान करणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. तसंच बिहारच्या राजकारणात नवा पर्याय निर्माण करण्यासाठी आता दुप्पट शक्तीनं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात बिहारचं राजकारण वेगळ्या वाटेनं जाण्याची शक्यता आहे.
बिहारच्या निवडणुकीनिमित्त गेल्या तीन वर्षांपासून प्रशांत किशोर राज्यात काम करत होते. पण तरीही त्यांचा जनसुराज पक्ष हा बिहारच्या जनतेपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यात अपयशी ठरली आहे. यावर आत्मचिंतन आणि प्रायश्चित करण्यासाठी प्रशांत किशोर, पश्चिम पंचारणमधील भितिहरवा स्थित गांधी आश्रमात गुरुवारी एक दिवसाचं उपोषण केलं. त्यानंतर शुक्रवारी मीडियाशी बोलताना किशोर यांनी आपली संपत्ती दान करणार असल्याची घोषणा केली.
प्रशांत किशोर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मी बिहारच्या जनतेच्या समोर हे वचन देतो की, पुढील पाच वर्षांत मी जे काही कमावेल त्याच्या ९० टक्के माझा पक्ष जनसुराज पार्टीला दान करणार आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी दिल्लीतील एक घर सोडून मी गेल्या २० वर्षांत जी चल-अचल संपत्ती कमावली आहे. ती सर्व जनसुराजला दान करणार आहे. आता हे आंदोलन पैशांच्या अभावी थांबणार नाही. मी बिहारच्या लोकांनाही आग्रह करतो की, त्यांनी जनसुराज पक्षासाठी कमीत कमी १ हजार रुपये दान करावेत.
बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज पार्टीनं २४३ पैकी २३८ जागा लढवल्या होत्या. पण प्रशांत किशोर यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. बिहारच्या निवडणुकीसाठी मोठ्या आशा निर्माण केलेल्या किशोर यांच्या पक्षानं आणि त्यांनी स्वतः पहिल्यांदाच निवडणूक लढवली. पण यामध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही, त्यामुळं सर्वच बाजूनं त्यांना टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं.
तर काही राजकीय विश्लेषकांनी बिहारच्या निवडणुकीत महिलांसाठी सरकारनं आणलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आणि त्यापोटी थेट बँक खात्यात जमा केलेल्या १०,००० रुपयांमुळं ही निवडणूक भाजप आणि जेडीयूच्या बाजूनं गेल्याचं म्हटलं आहे. हा निवडणुकीतला गैरप्रकार असून बिहारच्या निवडणुकीत सत्ताधारीपक्षाशिवाय इतर पक्षांना प्रचार, खर्च याबाबत समान संधी न मिळाल्यानं ही निवडणूक एकतर्फी झाल्याचंही या विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्याचंमुळं प्रशांत किशोर यांच्या पूर्वीच्या राजकीय रणनीतीकार म्हणून लोकांच्या मोठ्या अपेक्षा असल्या तरी त्यांचा पक्ष नवीन असल्यानं भाजप-जेडीयू-एलजेपी यांच्या एनडीए आणि काँग्रेस-जेडीयू यांच्या महागंठबंधनपेक्षा जनसुराजकडून जास्त अपेक्षा ठेवणंही चुकीचं असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.