Mamata Banerjee Sarkarnama
देश

President Rule News : ममतांचं सरकार जाणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची SC आयोगाची शिफारस

Rajanand More

West Bengal News : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सर्वच पक्षांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना घेरलं आहे, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असून, याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींनाही सादर केला आहे. त्यामुळे बंगालमध्ये पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (President Rule News)

बंगालमध्ये (West Bengal) उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या नेत्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील लोकांनी त्याविरोधात हल्लाबोल केला. बलात्काराचे गंभीर आरोप येथील महिलांकडून करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित नेत्यांना ममतांनी (Mamata Banerjee) पक्षातून काढून टाकले आहे.

मागील आठ दिवसांपासून बंगालमध्ये या प्रकरणावरून धुमशान सुरू आहे. भाजपने (BJP) बंगाल सरकारविरोधात मोर्चा उघडला असून, त्यात काँग्रेसही मागे नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची कोंडी झाली आहे. त्यातच अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सात सदस्यांना घेऊन गुरुवारी संदेशखाली येथे जात महिलांशी संवाद साधला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हलदर यांनी शुक्रवारी मीडियाला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आयोगाच्या सात सदस्यांची टीम संदेशखालीमध्ये गेली होती. पोलिसांनी अडवल्यामुळे टीमला सर्व पीडितांना भेटता आले नाही. पोलिसांनी सहकार्य केले नाही. या सर्व बाबी अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.

संदेशखालीमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना सुरक्षा मिळत नाही. सरकार केवळ गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत आहे. सर्व माहिती संकलित करून अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. मीडियातून मिळालेली माहिती आणि आम्ही तिथे जाऊन घेतलेल्या माहितीच्या आधारे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची शिफारस अहवालात केल्याचे हलदर यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

संदेशखालीमधील अनेक महिलांनी तृणमूलचे स्थानिक नेते शाहजहाँ शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी ते घरी मुलींना घेऊन जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांकडून तृणमूलच्या नेत्यांविरोधात आंदोलन केले जात असून, त्याला भाजपचीही साथ मिळत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मागील महिन्यात शेख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी स्थानिकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT