Narendra Modi & hridaynath  Mangeshkar
Narendra Modi & hridaynath Mangeshkar Sarkarnama
देश

मोदी बोलले ते सत्यच! : `सागरा प्राण` मुळे हृदयनाथ यांची नोकरी गेली होती..

विष्णू सानप

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आपले उत्तर देताना संसदेत काॅंग्रेसला घायाळ केले. काॅंग्रेसची (Congress) मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आता उपदेश करतात पण त्यांच्या काळात त्यांनी काय केले, याचे दाखले त्यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात दिले

हे सांगताना त्यांनी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांचा अनुभव मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता आकाशवाणीवर सादर केली म्हणून त्यांची नोकरी गेली होती, असे म्हणत काॅंग्रेसच्या काळातील गळचेपीचा दाखला दिला. त्यावरून बराच वाद पेटला आहे. मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीलाच नव्हते, असा दावा काहींनी केला. मुलाखतकार आणि मंगेशकर कुटुंबियांचे स्नेही सुधीर गाडगीळ यांच्याशी वाहिन्यांनी संपर्क साधत त्यांना याबाबत विचारले. त्यावर गाडगीळ यांनी हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीत नोकरीलाच नसल्याचे ठणकावून सांगितले होते. मात्र खुद्द हृदयनाथ यांनीच हा अनुभव चार वर्षापुर्वी `एबीपी माझा`च्या कार्यक्रमात सांगितला होता. त्यांनीच स्वतःबाबत सांगितलेली घटना असल्याने मोदी यांनीही भाषणात सत्य तेच सांगितल्याचे दिसून येत आहे. मोदी यांनी मंगेशकर यांचे मूळ गाव गोव्यातील असल्याचा उल्लेख करत त्याला राजकीय रंगही व्यवस्थितपणे दिला.

तर आकाशवाणीतील आपल्या नोकरीबाबत सांगताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले होते की, मी 1955 साली आकाशवाणीवर कामावर होतो. त्यावेळी मला 500 रूपये पगार होता. आज ते फार कमी वाटतात त्यावेळी वय फक्त 17 वर्ष होते. त्यावेळी पहिल्यांदा `तिन्ही सांजा सख्या` हे गाणं केल. हा पहिला मोठा प्रयोग होता. त्यांनी मला `किती रे दिन झाले`, हे गाणं दिल होत. त्यावेळी एक शिपाई होता. म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांचा कागद दुसऱ्या अधिकाऱ्यांना पोचवायचा. त्या माणसाच नाव आरती प्रभू! चि. त्र्यं. खानोलकर हे पु. ल. देशपांडे यांचा कागद मंगेश पाडगावकरांना द्यायचे. त्यावेळी तेथे काम करणाऱ्यांचा असा वैचारिक स्तर होता. त्यावेळी मी खूप खूश होतो. माझी सर्व गाणी आकाशवाणीवर घेतली. गाणीही चालली, पगारही मिळायचा. मात्र, रियाज सुटला होता.

स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी बोलताना त्यांनी आठवण सांगितली. ``या गाण्यांनंतर मी आय़ुष्यातील सर्वात मोठा प्रयोग केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याकडे गेलो. त्यांना मी `तात्या` म्हणायचो. त्यांना म्हणालो की, तुम्ही तर एवढे मोठे कवी. तुमची एखादी कविता द्या ना मला. चाल लावायला. तर ते म्हणाले, का तुला कारागृहात जायचे का? तेव्हा म्हणालो, तुमच्या कवितेला चाल लावल्याने कशाला कारागृहात जाईल? त्यावेळी ते म्हणाले, येईल तुला अनुभव. त्यांनी कुठली हवी कविता, असे मला विचारले. तुम्हीच निवडून द्या, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी मला `ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला,` ही कविता दिली. त्या कवितेला मी चाल लावली. ती ध्वनीमुद्रित झाली. सर्व खुश झाले. दुसऱ्या दिवशी मला मेमो आला. कारणे दाखवा नोटीस. ही कविता का वापरली म्हणून त्यात विचारण करण्यात आली होती. मी दोन मोठी कारणे दाखवली. फार मोठा कवी आणि फार मोठी कविता म्हणून निवडली, असेच उत्तर मी पाठविले. आकाशवाणीने मग मला नोकरीतून काढूनच टाकले. यानंतर फार उदास झालो. रडत होतो. त्यावेळी आकाशवाणी चर्चगेटच्या जवळ होती. तेथून गुरू खॅासाहेबांच्या घरापर्यंत चालत गेलो. त्यांनी समजूत काढली,`` असा सर्व घटनाक्रम मंगेशकर यांनी त्या कार्यक्रमात सांगितला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT