Rahul Gandhi and PM Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : मोदींचं स्वप्न धुळीस मिळवण्यासाठी राहुल गांधींची मोठी घोषणा; निवडणुकीआधीच...

Ganesh Thombare

Delhi News: लोकसभेच्या निवडणुका आल्या असल्याने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत 'चारसौ पार'चा नारा भाजपने दिला आहे. भाजपचा हा नारा रोखण्यासाठी काँग्रेसनेदेखील कंबर कसली असून, रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान मोदींनीदेखील सभागृहात बोलताना 'चारसौ पार'चा नारा देत अनेकदा उल्लेख केला होता. मात्र, आता मोदींचं 'चारसौ पार'चं स्वप्न धुळीस मिळवण्यासाठी राहुल गांधीदेखील अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मोठी घोषणाच केली आहे.

पंजाब, हरियाणा राज्यांतील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा लागू करण्याची प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे. याबरोबरच अजून काही महत्त्वाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, यासाठी शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करताना शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली होती. मात्र, त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच आता काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत राहुल गांधींनी मोठी घोषणा करत स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांना 'एमएसपी'ची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मोदी-शाहांना रोखण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले असून, निवडणुकीआधीच काँग्रेसची पहिली गॅरंटी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस अजून कोणत्या मोठ्या घोषणा करतं, हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे.

राहुल गांधींनी एक्सवर काय म्हटलं ?

"शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांच्या किमान आधारभूत हमीभावाची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल 15 कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे," अशी घोषणा राहुल गांधींनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत ?

  • हमीभाव कायदा व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

  • शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.

  • शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत.

  • केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत.

सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन रोखणार ?

पंजाब, हरियाणामधील शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचं हे आंदोलन रोखण्यासाठी दिल्लीतील बॉर्डरवर मोठमोठे सिमेंटचे कठडे, काटेरी तारांचे कुंपण आणि रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. तसेच दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने सरकार काय निर्णय़ घेतं, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT