Rahul Gandhi, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Vs PM Modi : 'काय झालं मोदीजी घाबरलात का?' ; अदानी-अंबानींच्या जाहीर उल्लेखावरून राहुल गांधींचा मोदींना टोला!

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते दिल्लापर्यंतच राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर उमेदवरांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते सर्वत्र प्रचारसभा घेत आहेत. यादरम्यान त्यांच्याकडून विविध वक्तव्यं केली जात आहेत, ज्यावरून नवीन चर्चा रंगत आहेत, तर काही वादही निर्माण होत आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदींनीही आज तेलंगणातील एका सभेत बोलतान अदानी आणि अंबानींचा उल्लेख करत एक विधान केलं ज्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी(Rahul Gandhi) त्यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी अदानी, अंबानींच्या चौकशीसाठी ईडी, सीबीआयला पाठवावे, की त्यांनी टेम्पो भरून पैसे पाठवले आहेत की नाही?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी त्यांच्या ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत की, 'नमस्कार मोदीजी थोडंसं घाबरलात का? साधारणपणे तुम्ही बंद खोलीत अदानी-अंबानींबाबत बोलतात. पहिल्यांदाच तुम्ही जनतेसमोर अदानी-अंबानी बोललात. आणि तुम्हाला हेही माहीत आहे, की हे टेम्पोतून पैसे देतात. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा सीबीआय-ईडीला तुम्ही यांच्याकडे पाठवा ना. संपूर्ण चौकशी करा. लवकरात लवकर करायला लावा. घाबरू नका मोदीजी.'

तसेच, 'मी देशाला पुन्हा एकदा सांगतो आहे, जेवढा पैसा नरेंद्र मोदींनी यांना दिला आहे ना, तेवढाच पैसा आम्ही भारतामधील गरीबांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिल नोकरी पक्की योजना या योजनांद्वारे करोडो लोकांना आम्ही लखपती बनवू. यांनी 22 अब्जोपती बनवले आम्ही कोट्यवधी जणांना लखपती बनवू,' असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते मोदी? -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बुधवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांची नावे घेत नसून त्यांनी या उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला आहे. हा पैसा घेतल्यानंतरच काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणं बंद केलं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

तेलंगणाच्या (Telangana) दौऱ्यावर असताना करीमनगर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'गेली 5 वर्षे काँग्रेसचे राजपुत्र दिवसरात्र अदाणी आणि अंबानी यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करायचे. परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अदाणी आणि अंबानींना शिव्या देणं बंद केले आहे. मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांनी या दोन्ही उद्योगपतींकडून पैशांची किती पोती भरून घेतली आहेत. काँग्रेसला (Congress) ट्रकभरून पोहोचले का, यांच्यात काय डील झाली? काँग्रेसला उद्योगपतींकडून निवडणुकीसाठी किती पैसे मिळाले?" असे प्रश्न मोदींनी या सभेत उपस्थित केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT