Rajasthan Politics  Sarkarnama
देश

Rajasthan Politics : वसुंधराराजे अन् गेहलोत यांचे बुरुज ढासळले; 'होम पिच'वर ओढवली नामुष्की...

Chetan Zadpe

Rajasthan News : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला असला तरी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना त्यांच्या गृहजिल्हा असलेल्या धौलपूरमध्ये त्यांचाच बालेकिल्ला वाचवता आला नाही. धौलपूरमध्ये काँग्रेसने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत. तर बसपाला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या मोठ्या विजयात वसुंधराराजे यांची होम पिचवरील झालेली मोठी नामुष्की चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

वसुंधराराजे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील त्यांच्या गृहजिल्हा जोधपूरमध्ये काँग्रेसला विजय मिळवून देता आलेले नाही. इथे काँग्रेसला 10 पैकी केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. धौलपूरमध्ये भाजपने तिकीट वाटप करताना ते सर्वसहमतीने ते देण्यात आले नाही, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे. याचाच फटका भाजपला बसल्याचे बोलले जाते. तर अशोक गेहलोत यांचा गृह जिल्हा जोधपूरमध्ये सत्ताविरोधी लाट होती. त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी बाजार उठल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धौलपूर, राजखेडा, बसेरीमध्ये काँग्रेसने विजय -

धौलपूर, राजखेडा आणि बसेरीमध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. बारी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या गिर्राज सिंह मलिंगा यांना बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जसवंत सिंग गुर्जर यांच्यासमोर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

राजकीय तज्ञांच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या राजकारणाचे गणित विरुद्ध दिशेने गेले आहे. वसुंधराराजे यांच्या विरोधकांना भाजपने तिकीट दिले होते. याबाबत राजकीय विश्लेषकही भाजपच्या पराभवासाठी गटबाजीला जबाबदार धरत आहेत. राजखेडा विधानसभा मतदारसंघात वसुंधराराजे समर्थक नेते तिकीटावर दावा करत होते.

माजी जिल्हाप्रमुख डॉ. धरमपाल सिंह जदौन, नागेंद्र सिंह चौहान आणि बच्चाराम बघेल हे वसुंधराराजे गटाचे नेते मानले जातात. तिन्ही नेते तिकीटावर दावा करत होते. डॉ. धरमपाल सिंह जदौन यांनी भाजपविरोधात बंड करून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती, मात्र हायकमांडच्या दबावामुळे त्यांनी योग्य वेळी उमेदवारी मागे घेतली. हायकमांडने नीरजा अशोक शर्मा यांना भाजपकडून उमेदवार म्हणून घोषित केले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT