BJP Sarkarnama
देश

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये पुन्हा ‘आयाराम’ ठरले वरचढ; निष्ठावंत वेटिंगवरच...

Rajanand More

New Delhi : मागील काही वर्षांत भाजपमधील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना बळावली आहे. अनेकांनी ते बोलूनही दाखवले आहे. विधान परिषद असो की राज्यसभेची निवडणूक, इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जात असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांपैकी चार इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले उमेदवार आहेत.

लोकसभेत निवडून गेलेल्या काही नेत्यांनी राजीनामा दिल्याने तर काहींची मुदत संपल्याने राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने आठ राज्यांतील नऊ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी गुरूवारी अर्जही दाखल केला.

धैर्यशील पाटील हे मुळचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते. त्यांनी 2019 च्या पेण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्यावर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. लोकसभेच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांना खासदार करण्याचा शब्द दिला होता. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

पाटील हे किमान पाच वर्षे भाजपमध्ये सक्रीय आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच इतर पक्षांतून आलेल्या तीन नेत्यांनाही भाजने उमेदवारी दिली आहे. भाजपने राजस्थानातून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना उमेदवारी दिली आहे. ते मुळचे पंजाबमधील काँग्रेसचे नेते. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आता त्यांना राज्यसभेतून संसदेत पाठवले जाणार आहे.

हरियाणातून किरण चौधरी उमेदवार आहेत. त्यांनीही काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मंगळवारीची आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार ममता मोहंता यांना ओडिशातून उमेदवारी मिळाली आहे. त्या मुळच्या बीजेडीच्या असून काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने पुन्हा त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले आहे. नऊपैकी चार उमेदवार बाहेरून आलेले असून भाजपमधील निष्ठावंत मात्र वेटिंगवरच असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांचे उदाहरणही ताजे आहे. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही तासांतच त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना आपल्याच बालेकिल्ल्यातून भाजपचा उमेदवार निवडून आणता आला नाही. या यादीत नारायण राणे, धनंजय महाडिक, उदयनराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील यांसह आणखी काही नेत्यांची नावेही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT