New Delhi News: जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता असलेल्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी युद्धाचा भडका उडाला होता. रशियानं युक्रेनच्या 'नाटो'च्या सदस्यत्वाला कडाडून विरोध करतानाच ऐतिहासिक संबंध आणि सीमा सुरक्षेचा कारणांवरुन युद्ध छेडलं होतं. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या हे युद्धाचे सावट अजूनही दूर झालेलं नाही. याच युद्धाबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे.
नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात परिचित आणि अत्यंत आदरणीय राजनेते आहेत. भारताचे रशियन फेडरेशनशी तसेच त्याआधी सोव्हिएत संघाशी निकटवर्तीय राष्ट्र म्हणून दीर्घकालीन संबंध आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे पंतप्रधान मोदींचे म्हणणे प्रत्यक्षात ऐकतात,असंही त्यांनी म्हटलं आहे.
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मोदींच्या कौतुकाला रशिया आणि युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे. व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की म्हणाले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सांगतात, याकडे गांभीर्याने लक्ष देतात.
तसेच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 2022 च्या अखेरीस युक्रेनमध्ये सामरिक अण्वस्त्रांचा (न्यूक्लिअर अटॅक) वापर करण्यापासून परावृत्त करण्यात पंतप्रधान मोदींची महत्त्वाची भूमिका राहिली होती, असा दावाही पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी हे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी दबाव टाकू शकतात. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर काही प्रमाणात दबाव आणू शकणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रभाव टाकू शकणाऱ्या मोजक्या जागतिक नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी एक आहेत. तसेच या दोन देशांमधील सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असा विश्वासही पोलंडचे मंत्री व्लादिस्लाव तेओफिल बार्तोशेव्स्की यांनी व्यक्त केला आहे.
भारताने पश्चिम आशियातील संघर्षावर घेतलेल्या भूमिकेवरही बार्तोशेव्स्की यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ते म्हणाले, "भारताची भूमिका योग्य आहे. कारण भारत हा मोठा आणि महत्त्वाचा देश आहे. भारताला तेलासह इतर वस्तूंचा मुक्त पुरवठा महत्त्वाचा आहे आणि भारत आखाती देशांतील तेल व वायूवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे."
ते पुढे म्हणाले, "पोलंडचे अजूनही इराणशी संपर्क आहेत. आम्ही त्यांना स्पष्ट केले आहे की, आमचा प्राधान्यक्रम राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा आहे. त्यामुळे आम्हीही पंतप्रधान मोदींप्रमाणेच संवादातून समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचा परिणाम मर्यादितच होत असल्याचे म्हणावे लागेल."
गेल्या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीसेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरममध्ये माध्यमांशी संवाद साधताना भारताला महान देश असं संबोधलं होतं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे समर्थनही केले होते. रशियासोबतच्या भारताच्या सहकार्याबाबत अमेरिकेकडून टाकल्या जाणाऱ्या दबावावर टीका करतानाच याप्रकारचे प्रयत्न द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी हानिकारक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे स्वतःच्या राष्ट्रीय हितानुसार ज्या देशांशी संबंध ठेवणे आवश्यक वाटते, त्या देशांशी संबंध वाढवणे हे स्वाभाविक असल्याचंही पुतिन यांनी यावेळी बोलताना म्हटलं होतं.
तसेच त्यांनी यावेळी रशियासोबतच्या सहकार्याच्या मुद्द्यावर अमेरिका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही केली होती. मात्र, नरेंद्र मोदींवर दबाव टाकणे हे आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक आहे. हा दबाव कुठूनही येत असला तरी त्याचे परिणाम हिताचं नसल्याचंही स्पष्ट करत अमेरिकेवर टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.