Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
देश

Sharad Pawar News: लोकसभेच्या निकालाआधीच पवारांचं मोठं विधान; 'कोणावर अवलंबून राहण्याची वेळ आली तर मोदी...'

Jagdish Patil

Sharad Pawar On Narendra Modi: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदान पार पडलं असलं तरी देशातील आणखी दोन टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे. तर या सर्व टप्प्यातील मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल 4 जूनला येणार असला तरी या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाचा पराजय होणार? तसेच देशात मोदींची सत्ता येणार की इंडिया आघाडी (India Alliance) सरकार स्थापन करणार याबाबतच्या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहेत.

एकीकडे 'अब की बार चारसो पार' म्हणत आपणच बहुमताचा आकडा गाठणार असल्याचा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. तर देशात आता सत्तांतर होणार असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून केला जात आहे. दोन्हीकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत मोठं भाकीत केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका यूट्यूब चॅनलसाठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) टीकास्र डागलं आहे. शिवाय सध्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या मुलाखतीत बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. महाराष्ट्राला पुन्हा त्या उंचीवर न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल.

यामध्ये सर्वात आधी राज्यातील गुंतवणुकीसंदर्भातील सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण करावं लागणार आहे. पूर्वी कोणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, त्यांची पहिली पसंती महाराष्ट्राला होती. परंतु आता तसं दिसत नाही. याला कारणीभूत राज्यातील नेतृत्व आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल असं वाटत नाही. असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली.

...तर मोदी स्वत:च त्यातून बाहेर पडतील

यावेळी पवारांना नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पंतप्रधानपदासंदर्भात वक्तव्य केलं. ते म्हणाले, "मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखतो, त्यानुसार ते जे काही दावे निवडणुकीच्या निकालाबाबत दावे करतायत. त्यावर त्यांचा खरंच विश्वास असेल आणि त्यांना जर या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तसंच सरकार स्थापन करण्यासाठी जर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तर ते स्वत:च त्यातून बाहेर पडतील, असं मला वाटतं." असं पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय? शिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारं बहुमत मिळालं नाही तर मोदी इतर पक्षांची मदत घेणार नाहीत का? असे विविध प्रश्न पवारांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT