Supriya Sule, Devendra Fadnavis Sarkarnama
देश

Maratha Reservation : प्रचारात गुंतलेल्या फडणवीसांना गृहमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; सुप्रिया सुळेंनी साधले करेक्ट टायमिंग

Sachin Waghmare

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणावरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील सर्व गावातून नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे.‌ याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापूर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. यामुळे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा. महाराष्ट्रातील स्थिती बिघडलेली आहे. चौकशी नेमून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या तातडीन राजीनामा घ्यावा. कारण गृहमंत्र्यांना आता झेपत नाहीये, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फक्त समित्या नेमून काय होणार आहे? मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी ४० दिवस का मागितले? आणि ४० दिवस हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय करत होतं? या सरकारने मराठा समाज आणि जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम या सर्वांची फसवणूक करण्याचं पाप हे खोके सरकार करतंय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) तातडीने राजीनामा द्यावा. राज्यात आता जाळपोळ सुरू झाली आहे. आमदाराचं घर जाळलं जातंय. पंचायत समितीची कार्यालय पेटवलं जातंय. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

जालनामध्ये अमानुष प्रकारे लाठीमार झाला. कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे. महिलांचे अपहरण सुरू आहे. जाळपोळ सुरू आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT