Narendra Modi, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Chandrababu Naidu-Narendra Modi : चंद्राबाबूंनी मोदींना दोनदा दिला होता जोरदार झटका; नेमकं काय घडलं?

Rajanand More

New Delhi : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. पण त्यांच्यासाठी पुढील पाच वर्षे कठीण असतील. मागील दोन टर्मप्रमाणे यावेळी भाजपला स्बळावर बहुमत मिळवता आले नाही. आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भरवशावर सरकार चालवावे लागणार आहे.

विशेष म्हणजे चंद्राबाबूंसह नितीश कुमार हे सध्या एनडीएमध्ये असले तरी यापुर्वी त्यांनी साथ सोडल्याचा इतिहास आहे. चंद्राबाबूंनी तर थेट नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधील दोन मंत्रिपदं सोडून देत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. त्याचप्रमाणे मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना बाबूंनी त्यांच्या एनडीएमध्ये असतानाही त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.

का संतापले होते चंद्राबाबू?

चंद्राबाबू यांचा तेलगू देसम पक्ष 1999 पासून एनडीएमध्ये आहे. पण मागील 25 वर्षांत त्यांनी दोनदा साथ सोडली होती. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही त्यांनी विविध मुद्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पण 2002 हे वर्ष महत्वाचे ठरले. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले अन् चंद्राबाबूंना संताप अनावर झाला.

चंद्राबाबूंनी थेट गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला होता. एवढेच नाही तर त्यांनी राज्यात निवडणुकांची मागणी केली होती. त्याला त्यावेळचे एनडीएतील घटक पक्ष असलेले तृणमूल काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी आणि जनता दलानेही पाठिंबा दिला होता. चारही पक्षांनी त्यावेळी एनडीएच्या बैठकीतून काढता पाय घेतला होता. 

2004 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा आणि आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा पराभव झाला. त्यानंतर बाबूंनी एनडीएची साथ सोडली. त्यासाठी त्यांनी गुजरात दंगलीचे कारण पुढे केले होते. दहा वर्षांतच त्यांना उपरती झाली आणि 2014 च्या निवडणुकीआधी पुन्हा एनडीएमध्ये दाखल झाले. केंद्रात आणि राज्यातही एनडीएला सत्ता मिळाली.

केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा

चंद्राबाबूंची एनडीएला मिळालेली साथ केवळ चार वर्षांचीच राहिली. मार्च 2018 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मार्च 2018 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू आणि विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री वाय. सत्यनारायण चौधरी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आठवडाभरातच टीडीपीने एनडीएची साथही सोडली.

मोदी सरकारविरोधात अविश्वास

चंद्राबाबू एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या पक्षाने थेट मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्याला काँगेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. जवळपास 12 तास त्यावर चर्चा झाली आणि मोदी सरकारच्या बाजूने 325 खासदारांनी पाठिंबा दिला. तर विरोधात केवळ 126 खासदार होते.

तेव्हापासून 2024 च्या निवडणुकांआधीपर्यंत भाजप आणि टीडीपीचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत होते. पण निवडणुकीआधी चंद्राबाबूंनी पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तो ऐतिहासिक ठरला. कारण राज्यात त्यांची आणि केंद्रात त्यांच्या पाठिंब्यावर मोदींची पुन्हा सत्ता आली. एकेकाळी मोदींचा राजीनामा मागणारे, केंद्रातील त्यांचे सरकार पाडण्यासाठी उतावीळ झालेल्या चंद्राबाबूंनी शुक्रवारी (ता. 8) कोणत्याही अटी-शर्थींशिवाय त्यांना पाठिंबा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT