Ashish Mishra
Ashish Mishra File Photo
देश

मंत्रिपुत्राची तब्येत बिघडली; डेंगीसोबत हाय शुगर अन् उपचारासाठी डॉक्टरांचे पथक

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला डेंगीची लागण झाल्याने सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता रक्तातील शर्कराही (शुगर) वाढल्याने त्याची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.

आशिष हा पोलीस कोठडीत असून, त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याला ताप आल्याने कारागृह प्रशासनाने रुग्णालयात हलवले होते. त्याची डेंगीची लक्षणे दिसून आल्याने चाचणी करण्यात आली होती. त्याला डेंगीची लागण झाल्याचा अहवाल मिळाला आहे. याचबरोबर त्याच्या रक्तातील शर्कराही खूप वाढली आहे. यामुळे त्याची तब्येत बिघडली असून, त्याच्यावर डॉक्टरांच्या पथकाने उपचार सुरू केले आहेत. लखीमपूर खीरी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनीही याबाबत माहिती देत याला दुजोरा दिला आहे.

या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. त्यातील तिघांना 23 ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून, यात मोहित त्रिवेदी, रांकू राणा आणि धर्मेंद्र यांचा समावेश आहे. या तिघांची नावे आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. या प्रकरणी सुरवातीला आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे आणि लवकुश राणा या दहा जणांना अटक झाली आहे. आशिष पांडे आणि लवकुश राणा हे दोघे वगळता इतर सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT