Government Job Fraud: सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित कामाचा पर्याय असं आजही लोक मानतात. त्यामुळं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो. अनेकदा काही हुशार मंडळींना एकापेक्षा अधिक वेळा सरकारी नोकऱ्या लागतात. पण यांपैकी कुठली तरी एक नोकरीच त्यांना स्विकारता येते. पण काही महाभाग असेही असतात की, त्यांचा सरकारी नोकरीचा हावरटपणा काही संपत नाही. याच भावनेतून एका व्यक्तीनं चक्क १६ वर्षे एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्या केल्या. पण जेव्हा त्याचं हे बिंग लक्षात आलं तेव्हा मात्र त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली.
उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला असून इथल्या कोतवाली नगर भागातील जय प्रकाश नावाच्या एका व्यक्तीनं पंधरा वर्षांपूर्वी दोन सरकारी नोकऱ्या लागल्या. यासंदर्भात प्रभात सिंह नामक कोतवाली नगर पोलीस ठाण्यात जय प्रकाश यानं फसवणूक करुन बनावट कागदपत्रे सादर करुन दोन सरकारी नोकऱ्या मिळवल्याची तक्रार दिली होती. ही तक्रार येताच पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करुन जय प्रकाश याला अटक करुन तुरुंगात धाडलं होतं. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक प्रेम सिंह रैकवार यांनी यासंदर्भात तपासणी पूर्ण करुन आरोप कोर्टात आरोपपत्र देखील दाखल केलं होतं.
दरम्यान, कोर्टाच्या एसपीओ अनार सिंह यांनी या खटल्याची सगळी हाकीकत सांगताना म्हटलं होतं की, आरोपी जय प्रकाश हा जनपद सुल्तानपूरमध्ये आरोग्य विभागात एएनएम पदावर कार्यरत होता. त्यानंतर इथला राजीनामा न देताच त्यानं बनावट कागदपत्रांद्वारे बाराबांकी जिल्ह्यातील शिक्षण विभागातही शिक्षकपदाची नोकरी करत राहिला. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणांहून मिळणारा पगारही तो घेत होता. इतकंच नव्हे शिक्षण विभागात त्याचं प्रमोशनही झालं आणि प्राचार्यपदावर त्याची नियुक्तीही झाली.
पण प्रभात सिंह नामक एका व्यक्तीला जय प्रकाशच्या या उद्योगांची कुणकुण लागली होती, त्यामुळं त्यानं त्याच्या या दोन्ही नोकऱ्यांसंदर्भात माहिती अधिकारात अर्ज केला होता. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर प्रभात सिंह यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांची तक्रार ही गंभीर स्वरुपाची असल्यानं पोलिसांनी याप्रकरणात शासनाच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी जय प्रकाश याला अटक करुन तुरुंगातही पाठवलं.
याप्रकरणात अनेक वर्षे खटला चालला. यामध्ये तत्कालीन बीएसएसहित चार साक्षीदारांना कोर्टात हजर करुन त्यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यातही तक्रारदाराची तब्येत ठीक नसल्यानं याची सुनावमी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही घेण्यात आली होती. त्यानंतर न्यायाधिश सुधा सिंह यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय सुनावला होता. कोर्टानं आरोपी जय प्रकाश सिंह याला दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर दोन्ही सरकारी विभागांमध्ये मात्र मोठा भूकंप झाला. पण उत्तर प्रदेशात या गोष्टी साधारण असल्याचं दिसून येतं. कारण अशा प्रकारच्या घटना यापूर्वी देखील अनेकदा घडल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक आणि इतर सरकारी विभागांमध्ये खोटी प्रमाणपत्रे देऊन नोकरी केल्या प्रकरणी कारवाया झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.