imran pratapgarhi | rahul gandhi
imran pratapgarhi | rahul gandhi  
देश

विश्वबंधू राय यांचा लेटरबॉम्ब; राज्यसभा उमेदवारीवरुन कॉंग्रेसमध्ये धुसफुस कायम

सरकारनामा ब्युरो

Rajyasabha Elelction 2022:

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरू झाली आहे. राज्यसभेच्या जागेवरुन कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून उघड उघड ही नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी पवनखेडा, नगमा, पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दहा उमेदवारांची नावे जाहीर केली. यात तामिळनाडूमधून पी चिदंबरम, कर्नाटकातून जयराम रमेश, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, राजस्थानमधून प्रमोद तिवारी आणि महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ज्यामुळे राज्यात कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सुर आहे.

इमरान प्रतापगढींवर राय यांचा निशाणा

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या कोट्यातून युपीचे इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने विश्वबंधू राय यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात विश्वबंधू यांनी म्हटले आहे की, ''इमरान प्रतापगढी दोन-तीन वर्षांपूर्वीच पक्षात सामील झाले. मुरादाबादमधून 6 लाख मतांनी पराभूत होऊनही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. मुरादाबाद लोकसभेची निवडणूक जवळपास 6 लाख मतांनी हरली. आतापर्यंत एकाही महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी जिंकलेली नाही. तरीही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले.

आता त्यांना थेट राज्यसभेवर पाठवले जात आहे. मग पक्ष एकाच व्यक्तीवर इतका मेहरबान का आहे, त्यांच्या मुशायर्‍यात असे कोणते गुण आहेत की पक्षातील इतर लायक नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना केला आहे.

पंजाबमध्येही नवज्योत सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवणे अशीच चूक होती. सिद्धूही इमरानप्रमाणेच कविता करायचे. अशा स्थितीत पक्षात पद मिळविण्यासाठी आता आम्हीही कविता करायला हव्यात का, महाविकास आघाडी सरकारमध्येही काँग्रेस नेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रारही राय यांनी आपल्या पत्रात केली आहे.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपली नाराजी व्यक्त करणारे विश्वबंधू एकटे नाहीत. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन पवनखेडा यांनी देखील सोनिया गांधींकडे तक्रार केली होती. आमच्या तपश्चर्येत काही कमतरता राहिली का असा सवाल त्यांनी केला होता. राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव राहिली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तर अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनीही पवन खेरा यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले की, आमची १८ वर्षांची तपश्चर्या इमरान प्रतापगढीसमोर कमी पडली. या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तिकिटांच्या घोषणेवर फार काही न बोलतातिकीट वाटपात दुर्लक्ष झाल्याचा संदेश त्यांनी मोजक्याच शब्दांत दिला. याशिवाय महाराष्ट्रातील मुकुल वासनिक यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT