Pawan Khera, Supriya Shrinate
Pawan Khera, Supriya Shrinate Sarkarnama
देश

Election in India : निवडणुकांमध्ये इस्त्रायली हॅकर्सचा वापर केला का? काँग्रेसच्या थेट प्रश्नावर भाजपचे मौन

सरकारनामा ब्युरोे

Israeli company influence elections : इस्रायलच्या एका कंपनीवर ३० हून अधिक देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील चौकशी अहवालात मोठे खुलासे झाले आहेत. आता या प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या निवडणुकीत इस्त्रायली कंपनीने हस्तक्षेप केला का? असा प्रश्न उपस्थित करून कंपनीच्या कथित वापराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने गुरुवारी केली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या इस्त्रायलमधील कंपनीने जगभरातील ३० निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, असा धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. संबंधित कंपनी आणि तिच्या कार्यपद्धतीवर विविध माध्यमसमूहातील ३० पत्रकारांनी आठ महिने संशोधन केले आहे. त्यानंतर त्यांनी या कंपनीने जगातील ३० निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

संबंधित इस्त्रायली हॅकर्स (israeli hackers) कंपनीचं नाव ‘जॉर्ज’ आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअरचे नाव ‘एआयएमएस’ (AIMS) म्हणजेच अडव्हान्स इम्पॅक्ट मीडिया सोल्यूशन असे आहे. या कंपनीने सोशल मीडियावर हॅकिंग करून आणि चुकीची माहिती पसरवून जगभरातील ३० पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा दावा पत्रकारांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी भाजपानेही परदेशी हॅकर्सचा वापर केला का? याची दखल घेत तशी चौकश करण्याची मागणी केली आहे.

हा अहवाल प्रसारित झाल्यानंतर काँग्रेस मीडिया युनिटचे प्रमुख पवन खेरा (Pavan Khera) यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी खेरा यांनी, "भारतातील सत्ताधारी पक्षाकडूनच भारतातील लोकशाहीचे अपहरण केले जात आहे. देशाच्या लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेतली जात आहे. भारतात बसून ते इतर देशांसोबत भारताच्या लोकशाहीविरुद्ध कट रचत आहेत," असा आरोप केला.

पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा (Pavan Khera) आणि सुप्रिया श्रीनाते यांनी इस्त्रायली युनिट 'टीम जॉर्ज' आणि भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा संदर्भ देत देशातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अपप्रचार आणि 'फेक न्यूज' पसरवली जात असल्याचा दावा केला. भारतातील नागरिकांच्या डेटाशीही तडजोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने यावर मौन सोडले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) म्हणाल्या की, "इस्रायली कंपनीने भारतासह ३० निवडणुकांमध्ये हेराफेरी केली. पण मोदी सरकार गप्प का? पेगॅससवर मोदी सरकार काही बोलले नाही? भाजपच्या आयटी सेलचा आणि त्यांच्या तथाकथित भागीदारांचा या फेक न्यूजमध्ये काय सहभाग आहे?'' या प्रकरणावर सरकारने मौन सोडले पाहिजे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT